सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

मोगऱ्याची कळी

पाहिलंय मी त्या मोगऱ्याच्या कळीला
त्या ओल्या पावसात चिंब भिजताना
त्या पांढऱ्या शुभ्र धुक्यात 
अलगत उमलताना
                       सूर्याची कोवळी किरणे
                       अंगावर झेलताना
                       विजेच्या प्रकाशात
                       आनंदाने चमकताना
पाहिलंय मी तिला, सुगंधाने
सगळ्यांना बेधुंद करताना
त्या अत्तराला आपलं 
अस्तिव बहाल करताना 
                      ती कळी असताना च 
                      तिला गजऱ्यात विणताना
                      स्त्रियांच्या केसात 
                      कोमेजून जाताना...!
                 
                  - आदिती जाधव.

#मराठी #मराठीसाहित्य #कविता  #मोगरा #अत्तर #गजरा #बोल_रातराणीचे

बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

रातराणी

शब्दांची माळ गुंफता गुंफता
मन अचानक सैरभैर झालं
कसल्याशा सुगंधात नकळत
स्वतःला विसरून गेलं
 
पाऊले अचानक दाराकडे वळली
अंगणातल्या कोपऱ्यात नजर फिरवली
डोळ्यासमोरून कुणीतरी चमकून गेलं
जाता जाता जणू त्या झाडावर 
टिपूर चांदणं शिंपडून गेलं

अंधारलेल्या रात्री चंद्राशिवाय
चांदणं बहरलं होतं
आज पहिल्यांदा त्या झाडावर
कुणी तरी फुललं होतं

वाऱ्याच्या मंद लहरीत ते
त्या अंधारात अलगत डुलत होतं
तिला पाहताच चेहऱ्यावर हास्य उमललं होतं
आज त्या रातराणी ला पाहून
माझं मन ही आनंदाने गुणगुणत होतं
                           
- ©आदिती जाधव.

#मराठी #मराठीसाहित्य #कविता #अनुदिनी #रातराणी

रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

गूढ

आज सहजच ती खिडकीपाशी आली. चंद्राकडे पाहत कुठे तरी हरवून गेली. अचानक भानावर आली, नजर इकडे तिकडे फिरवली. गजबजलेल्या शहरात तिला आज अनेक दिवसांनी शांतता गवसली.., नाही ! शहर मुळीच शांत नव्हते. त्या शहरातला कानेर फक्त तिला जाणवत नव्हता. एरवी जरा जरी आवाज झाला तरी तिची चिडचिड होई. मुंबई सारख्या भल्या मोठ्या शहरात, एका लहानश्या कुटुंबात काव्या श्वास घेत होती. तिच्या देखत त्या शहरात जिवंतपणा उरला नव्हता. सूर्याचं आगमन होतं नाही की, शहर उठू लागतं, सूर्य निघून चंद्र आला तरी या शहरात राहणाऱ्या माणसांचं राबणं थांबत नाही. नाना प्रकारची वाहनं, माणसं, त्यांचा तो आवाज, गडबड, गोंधळ ह्या सगळ्याच गोष्टी तिला रसहीन वाटत होत्या.
     दूरध्वनी वाजला, पाहिलं तर कंपनीने संपर्क साधला होता. काव्याला हल्ली तो मोबाईल ही फारसा रोचक वाटत नसे. काय तेच तेच पाहायचं आणि ती व्हाट्सएप, फेसबुक..., तिला सगळंच कंटाळवाणं वाटतं असे. आज तरी ही तिने इन्स्टाग्राम उघडून पहिला, तिथे कोणीतरी नवीन च फोटो पोस्ट केला होता, ते पाहूनच तिने इन्स्टाग्राम बंद केलं अन् तो दूरध्वनी बंद करणार इतक्यातच तिला व्हाट्सएपवर कोणाचा तरी संदेश आला, तिने पाहिलं तर तिच्या महाविद्यालयातल्या मैत्रिणीच्या व्हाट्सएप गटावर कोणी तरी संदेश टाकला होता. तिने तो संदेश पाहून काहीच प्रतिउत्तर न देता स्टेटस् पाहिले तर केवढे ते स्टेटस् एकाच वेळी टाकलेले, तिने ते न पाहताच दूरध्वनी बंद करून तो टेबलवर ठेवला. तेवढ्यात घरात काही संवाद कानावर पडले, घरात सगळ्यांनीच अजाणतेपणी घेतलेली मौन राहण्याची शपथ तुटतेय की काय..? ह्या विचाराने तिने बाहेर येऊन पाहिलं तर  तिची आई मोठ्या आवाजात काही तरी बोलत होती आणि तिचे बाबा ही त्याच आवाजात तिच्या आईला उत्तर देत होते. त्यांच्या घरी सहसा असेच संभाषण होत असे पौर्णिमा-अमावस्येला, ते ही गडगडाट झाल्यासारखं, कधी कधी तर विजा ही चमकतात. काव्या त्याच पावलांनी परत आली आणि पुन्हा चंद्राकडे पाहू लागली आता तर अनेकांना प्रेमात पडणारा चंद्र ही तिला निस्तेज वाटत होता. त्या लुकलुकणाऱ्या चांदण्या, ते तारे..., सगळेच त्या शहरांतल्या रस्त्यांवर असणाऱ्या सिग्नलच्या दिव्यांप्रमाणे तिला वैतागवाणे वाटत होते. तिने हलकाच सुस्कार सोडला आणि हळुवार डोळे मिटले. तिच्या काळ्याभोर डोळ्यातून, गालावर अलगद पाण्याचा थेंब पडला आणि परत एकदा तिला श्वास घेणं जीवावर आलं.
     काव्या येऊन पलंगावर बसली. एक पेन हातात घेऊन कोऱ्या कागदावर काही अक्षरं टिपू लागली...,

                  इथेच खोल दडले, गूढ माझ्या मौनाचे
                  का शोधताय तुम्ही या कोऱ्या कागदावर
                  जिथे फक्त उमटलीत भावनाहीन चार अक्षरे..!


              - ©आदिती जाधव.

#मराठी #मराठीसाहित्य #गूढ #अनुदिनी #शहर #मुंबई 

सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१

तीन-दोन-पाच

जून महिन्यात काही कारणास्तव गावाला जाऊन आली. तसे आम्ही सगळेच गेलो होतो गावी पण पप्पा, मोठे पप्पा आणि बाबी ( लहान आत्या ) लवकर मुंबई ला आले. आम्ही गावाला च थांबलो होतो. पावसाचे दिवस, बाहेर चिखल झाली होती सोबत ओझरता पाऊस होताच.. अंकल, दादा, बाबू आणि वाडीतले इतर पुरुष मंडळी कुरल्या पकडायला गेले होते. मी आणि दीदी ओट्यावरच बसून होतो. आम्हा दोघींना ही खूप वैताग आला होता. बारक्यापोराचे ऑनलाईन क्लासेस सुरू झाले होते, ती त्यात व्यस्त. बसून बसून आम्ही मग एक पत्त्यांचा डाव खेळायचा ठरवला, तेवढ्यात मम्मी, मोठी मम्मी जेवण बनवून बाहेर ओट्यावर येऊन बसल्या. आम्ही पत्ते काढून ते पिसत च होतो, इतक्यात मोठ्या मम्मीलाही आमच्या सोबत खेळायची इच्छा झाली. आता काय खेळायचं..? तीन-दोन-पाच..!
       खेळ सुरू झाला. पहिल्याच डावात माझ्यावर पाच, दीदी वर तीन आणि मोठ्या मम्मी वर दोन हात आले. जेव्हा हे तीन पत्ते उघडले तेव्हा हास्याचा कल्लोळ उडाला.., पहिल्याच डावात मम्मी वर दोन हात आलेले पाहून मी आणि दीदी तर चकित च झालो. बरं, खेळ सुरू झाला, हळू हळू हात घेतले. मोठी मम्मी पहिल्यांदा च तीन-दोन-पाच खेळत होती पण ती इतकं भारी खेळत होती की मला आणि दीदी ला तूर्तास वाटलं होतं की, ही आता आमचे हात खेचणार ! आणि तिने ते खेचले सुद्धा ! माझ्यावर पाच असताना तिने माझे दोन हात अन् दीदी वर तीन हात असताना तिचा एक हात मम्मी ने खेचला. आणि ह्या पहिल्या डावातच तिने आमच्यावर हात चढवले.., ते बघून माझी मम्मी सुद्धा चकित झाली. मी आणि दीदी तर मोठ्या मम्मी कडे फक्त बघत होतो आणि ती आमच्याकडे बघून हसत होती. दुसऱ्या डावात आम्ही ते हात फेडले, आता माझ्यावर दोन, दीदी वर पाच आणि मम्मी वर तीन हात होते. ह्या खेपेला मम्मी ने एकटीने दीदी चे दोन हात खेचले. ते सुद्धा फिटले मग पुढच्या फेरीस मम्मी वर पाच, माझ्यावर तीन अन् दीदी वर दोन हात होते. हा डाव जरा रंगला, ह्या वेळी मम्मी ने आमचे नाही आम्ही मम्मी चे हात खेचले. त्यानंतर मम्मी थोडीशी चिडली सुद्धा पण ह्या वेळी अशी गम्मत झाली अन् मग सगळेच हसू लागलो. आम्ही खेळता खेळता बारक्यापोराने आमचे सहा - सात तरी फोटोस् काढले असतील त्यातला हा एक फोटो 
       आता मुंबई ला येऊन जेव्हा पत्यांकडे लक्ष जातं तेव्हा-तेव्हा हा क्षण डोळ्यांपुढे येतो. त्या दिवशी पत्ते खेळायचा मम्मी चा पहिला वहिला अनुभव तिला इतका आवडला की तिने तीन-दोन-पाच हा खेळ बऱ्याचदा खेळला. तशी ती आमच्या घरातली मोठी सून आहे पण कधी कधी आमच्यातलीच लहान-सहान चेडू भासते. सध्याच्या परिस्थितीत कसला न कसला त्रास तर सगळ्यांना च होतोय पण ह्या काळात कुटुंबाशी पुन्हा एकदा नव्याने एकरूप होता आलं. जवळपास दोन-तीन वर्षांनंतर आम्ही सगळे असे एकत्र भेटलो होतो, एकत्र बसून गप्पा टाकत होतो. पत्त्यांचे डाव रंगवताना एकमेकांसोबत नव्याने रंगत होतो. आता सगळेच वाट पाहतोय परत गावाला जायची आणि ओट्यावर बसून पत्त्यांचे डाव मांडायची.
       - आदिती जाधव.


#मराठी #मराठीसाहित्य #अनुदिनी #कोकणातलंघर #पत्त्यांचाडाव

शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१

छत्रीतली मेनका । ( भाग २ )

      बेल वाजली, दुसरा तास सुरू झाला. दोघे ही वर्गात गेले. दोघे ही गप्प, असेच पुढचे तास ही निघून गेले आणि मधली सुट्टी झाली. कुणाल, निनाद ला मैदानात घेऊन गेला. मग निनाद च म्हणाला, " काय झालंय माहीत नाही रे, पण ती जात च नाहीये डोक्यातून", कुणाल जास्त काही न बोलता त्याला फक्त इतकाच म्हणाला की, "अरे इतकं काही नाही, होतं असं कधी कधी जास्त विचार नको करुस. तू हुशार आहेस, ह्या सगळ्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष नको करुस.., हो ! माहिती आहे मला तू नाही करणार असं पण, मी सकाळ पासून पाहतोय तुला, तुझं लक्ष च नव्हतं वर्गात आणि राहिला प्रश्न 'ती' चा तर, आपण आज जाऊन पाहू ती माळावर दिसते का.., जर दिसली तर बघू, नाही दिसली तर त्याचा ही जास्त विचार नको करुस. चल, भूक लागली आहे मला. डब्यात आई ने तुझ्या आवडीची चण्याची भाजी दिली आहे मस्त चमचमीत ! चल खाऊ." असं म्हणून दोघे ही वर्गात गेले. तास संपले, महाविद्यालय सुटलं. ठरल्याप्रमाणे दोघे ही देवळाच्या माळावर गेले, "मला असं वाटतंय की, आपण नको यायला पाहिजे होतं इकडे, चल जाऊ परत," निनाद जरासा अस्वस्थ होऊन सांगू लागला. कुणाल ने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, " थांबू थोडा वेळ, पाहू येतेय का ती." खरं तर इतक्या वर्षात निनाद ला एका मुली साठी इतकं अस्वस्थ झालेलं कुणाल ने कधी पाहिलं च नव्हतं. 
      संध्याकाळ होतं आली होती. आभाळ रंग बदलू लागलं होतं, पण 'ती' छत्रीतली मेनका काही दिसेनाच. शेवटी मग नाही नाही म्हणता निनाद ने हट्ट च धरला घरी परत जायचा, कुणालकडे दुसरा पर्याय सुद्धा नव्हता. दोघे ही घरी जायला निघाले, जाता जाता न राहून कुणाल ने निनाद ला विचारलंच की, "तुझ्या डोक्यात नक्की काय सुरू आहे. ह्या वयात एखादी मुलगी आवडणं साहजिक आहे, इतका कसला विचार करतोयस..?" निनाद थांबला आणि म्हणू लागला, " हे सगळं साहजिक आहे मला ही समजतंय पण; ज्या मुलीचा चेहरा ही पहिला नाही मी, त्या मुलीचा इतका विचार का करतोय मी, ह्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये रे ! आणि..., खरं तर तिचा विचार करण्यापासून मी स्वतःला थांबवू पाहतो पण नाही रे, जमत च नाही आहे, ती जातचं नाहीये डोक्यातून. पहिल्यांदाच होतंय असं, कळत नाहीये मला काय करू." निनादचा हा गोंधळ सोडवणं कुणाल ला काही जमत नव्हतं, दोघे ही शांत उभे होते. "चल जाऊ घरी, अभ्यास करायचा आहे." असं म्हणून निनाद घराच्या दिशेने चालू लागला, कुणाल ही त्याच्या सोबत च घरी गेला. रात्र गेली, सकाळ झाली. तास कमी असल्याकारणाने महाविद्यालय आज लवकर सुटलं. आज संध्याकाळी सगळ्यांनी चहाच्या टपरी वर भेटायचं ठरवलं. सगळे जमले पण निनाद काही दिसत नव्हता. मग कुणालने त्याला कॉल केला, त्यावेळी निनाद झाडाखाली उभा होता.
 निनाद ने कॉल उचलला, "हो, येतोय मी अर्ध्या रस्त्यात आलोय" असं म्हणून टपरीवर जाऊ लागला. समोरून त्याला सावनी ताई येताना दिसली, " काय रे.., आज एकटाच..? कुणाल आणि बाकी सगळे कधी चे थांबलेत तिकडे " असं विचारू लागली. " आज जरा उशीर झाला गं ताई, हे काय चाललोय आता " असं म्हणून तो पुढे जाऊ लागला. 
      'सावनी' ही कुणाल ची मोठी बहीण. निनाद देखील तिला कुणाल सारखा च होता. निनाद थांबला आणि पाठीमागे पाहून " ताई ऐक ना " असं सावनी ना म्हणाला. सावनी ने " बोल ना काय झालं ? " असं विचारलं. निनादला काय बोलावं सुचत नव्हतं मग तिने च विचारलं, "सगळं ठीक आहे ना ?." 'हो' अश्या अर्थाने मान डोलावून निनाद तिला सांगू लागला, " हो म्हणजे तसं सगळं च ठीक आहे पण, हल्ली थोडं विचित्र वाटतंय. अभ्यासात लक्ष लागत नाहीये, कळत नाहीये काय करू." सावनी त्याच्याकडे पाहून हसू लागली आणि म्हणाली, " कुणाल ने सांगितलं मला, तू अस्वस्थ झाला आहेस ते पण, कारण काही सांगितलं नाही." निनाद हसू लागला आणि म्हणाला, " इकडेच दोन दिवसांपूर्वी कोण तरी दिसली होती मला, छत्रीमुळे मला तिचा चेहरा दिसला नाही, पण तरीही तिचा विषय काही डोक्यातून जात नाही आहे माझ्या. तुला सांगू का.., खरं तर मुद्दा असा आहे की, हे सगळं असं का होतंय ह्याच उत्तर मिळत नाहीये मला त्याचा जास्त त्रास होतोय आणि मला स्वतःला थांबवता ही येत नाहीये तिचा विचार करण्यापासून." सावनी ने सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाली, " निनाद रिलॅक्स ! ज्या वयात तुम्ही आता आहात, त्या वयात असं होणं खूपच साहजिक आहे, इतका त्रास नको करून घेऊस, ह्या पुढे ही अश्या खूप मुली दिसतील तुला, त्यांचे चेहरे ही दिसतील म्हणून तू प्रत्येकी साठी इतका अस्वस्थ होणार आहेस का..? आणि तिच्याविषयी सांगायचं झालं तर, तिने तुझं लक्ष का वेधून घेतलं तुझं तुला ठाऊक, तिच्या विषयी तुला काय वाटतं हे ही तुझं तुला च ठाऊक पण लक्षात घे अजून खूप लहान आहात तुम्ही, आता कुठे तुम्हाला जगण्याची खरी मजा कळेल. हळू हळू तरुण वयात प्रवेश कराल असे अनेक अनुभव येतील तुम्हाला, प्रत्येक गोष्टीसाठी डोक्याला इतका ताप नको देउस. आता तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे ते बघ, त्याचा विचार कर, अजून खूप काही बाकी आहे, ये तो शुरुवात है..! बाकी आता काय करायचं, कुणाला महत्व द्यायचं आणि किती द्यायचं ते तुझं तू ठरव. जिंदगी में अभी बहुत आगे जाना है।" हे सगळं ऐकून निनाद चा गोंधळ जरासा दूर झाल्याचं दिसलं. " थँक्स ताई," असं म्हणून दोघे ही आपापल्या रस्त्याने निघाले.
      निनाद टपरीवर पोहचला. मित्रांच्या गप्पा झाल्या, सगळे घरी सुद्धा परतले, निनाद आणि कुणाल त्यांच्या अंगणातल्या, आंब्याच्या चौथऱ्यावर बसून गप्पा मारत होते. निनाद ला परत पूर्वीसारखं मोकळं आणि तणावमुक्त पाहून कुणाल ला छान वाटलं. " काय रे.., भेटली वाटतं तुला, तुझी 'छत्रीतली मेनका' नाही..! म्हणजे सकाळ पर्यंत जो ताण होता तुझ्या चेहऱ्यावर तो आता ओसरल्यासारखं वाटतंय म्हणून विचारलं." असं विचारत कुणाल ने निनाद ची थट्टा केली. त्याला प्रतिउत्तर देताना निनाद म्हणाला, " 'ती' नाही भेटली पण सावनी ताई भेटली, तिच्याशी बोललो तर आता जरा मोकळं वाटतंय." कुणाल ने विचारलं, "का ? असं काय बोलली ताई..?" निनाद उत्तरला, "जास्त काही नाही रे ! ह्या सगळ्याकडे पहायचा दृष्टीकोन बदलला माझा. आज दुपार पर्यंत 'ती कोण आहे' याचं उत्तर शोधत होतो, दुपार नंतर 'मी कोण आहे' याचं उत्तर शोधावसं वाटतंय, इतकंच !" एवढं बोलून दोघेही घरी गेले. त्या संध्याकाळ पासून निनाद चा प्रवास सुरु झाला.. ' मी कोण ' हे शोधण्याचा..
               
                     - ©आदिती जाधव.

Featured Post

पत्रास कारण की...

प्रिय तू ,    आज खरंतर इतक्या वर्षात पहिल्यांदा तुला पत्र वगैरे लिहितेय, थोडं दिल खुलास होऊन सांगतेय. तुझी तक्रार असावी माझ्याकडून की, मी का...