लघुकथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लघुकथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

गूढ

आज सहजच ती खिडकीपाशी आली. चंद्राकडे पाहत कुठे तरी हरवून गेली. अचानक भानावर आली, नजर इकडे तिकडे फिरवली. गजबजलेल्या शहरात तिला आज अनेक दिवसांनी शांतता गवसली.., नाही ! शहर मुळीच शांत नव्हते. त्या शहरातला कानेर फक्त तिला जाणवत नव्हता. एरवी जरा जरी आवाज झाला तरी तिची चिडचिड होई. मुंबई सारख्या भल्या मोठ्या शहरात, एका लहानश्या कुटुंबात काव्या श्वास घेत होती. तिच्या देखत त्या शहरात जिवंतपणा उरला नव्हता. सूर्याचं आगमन होतं नाही की, शहर उठू लागतं, सूर्य निघून चंद्र आला तरी या शहरात राहणाऱ्या माणसांचं राबणं थांबत नाही. नाना प्रकारची वाहनं, माणसं, त्यांचा तो आवाज, गडबड, गोंधळ ह्या सगळ्याच गोष्टी तिला रसहीन वाटत होत्या.
     दूरध्वनी वाजला, पाहिलं तर कंपनीने संपर्क साधला होता. काव्याला हल्ली तो मोबाईल ही फारसा रोचक वाटत नसे. काय तेच तेच पाहायचं आणि ती व्हाट्सएप, फेसबुक..., तिला सगळंच कंटाळवाणं वाटतं असे. आज तरी ही तिने इन्स्टाग्राम उघडून पहिला, तिथे कोणीतरी नवीन च फोटो पोस्ट केला होता, ते पाहूनच तिने इन्स्टाग्राम बंद केलं अन् तो दूरध्वनी बंद करणार इतक्यातच तिला व्हाट्सएपवर कोणाचा तरी संदेश आला, तिने पाहिलं तर तिच्या महाविद्यालयातल्या मैत्रिणीच्या व्हाट्सएप गटावर कोणी तरी संदेश टाकला होता. तिने तो संदेश पाहून काहीच प्रतिउत्तर न देता स्टेटस् पाहिले तर केवढे ते स्टेटस् एकाच वेळी टाकलेले, तिने ते न पाहताच दूरध्वनी बंद करून तो टेबलवर ठेवला. तेवढ्यात घरात काही संवाद कानावर पडले, घरात सगळ्यांनीच अजाणतेपणी घेतलेली मौन राहण्याची शपथ तुटतेय की काय..? ह्या विचाराने तिने बाहेर येऊन पाहिलं तर  तिची आई मोठ्या आवाजात काही तरी बोलत होती आणि तिचे बाबा ही त्याच आवाजात तिच्या आईला उत्तर देत होते. त्यांच्या घरी सहसा असेच संभाषण होत असे पौर्णिमा-अमावस्येला, ते ही गडगडाट झाल्यासारखं, कधी कधी तर विजा ही चमकतात. काव्या त्याच पावलांनी परत आली आणि पुन्हा चंद्राकडे पाहू लागली आता तर अनेकांना प्रेमात पडणारा चंद्र ही तिला निस्तेज वाटत होता. त्या लुकलुकणाऱ्या चांदण्या, ते तारे..., सगळेच त्या शहरांतल्या रस्त्यांवर असणाऱ्या सिग्नलच्या दिव्यांप्रमाणे तिला वैतागवाणे वाटत होते. तिने हलकाच सुस्कार सोडला आणि हळुवार डोळे मिटले. तिच्या काळ्याभोर डोळ्यातून, गालावर अलगद पाण्याचा थेंब पडला आणि परत एकदा तिला श्वास घेणं जीवावर आलं.
     काव्या येऊन पलंगावर बसली. एक पेन हातात घेऊन कोऱ्या कागदावर काही अक्षरं टिपू लागली...,

                  इथेच खोल दडले, गूढ माझ्या मौनाचे
                  का शोधताय तुम्ही या कोऱ्या कागदावर
                  जिथे फक्त उमटलीत भावनाहीन चार अक्षरे..!


              - ©आदिती जाधव.

#मराठी #मराठीसाहित्य #गूढ #अनुदिनी #शहर #मुंबई 

शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१

छत्रीतली मेनका । ( भाग २ )

      बेल वाजली, दुसरा तास सुरू झाला. दोघे ही वर्गात गेले. दोघे ही गप्प, असेच पुढचे तास ही निघून गेले आणि मधली सुट्टी झाली. कुणाल, निनाद ला मैदानात घेऊन गेला. मग निनाद च म्हणाला, " काय झालंय माहीत नाही रे, पण ती जात च नाहीये डोक्यातून", कुणाल जास्त काही न बोलता त्याला फक्त इतकाच म्हणाला की, "अरे इतकं काही नाही, होतं असं कधी कधी जास्त विचार नको करुस. तू हुशार आहेस, ह्या सगळ्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष नको करुस.., हो ! माहिती आहे मला तू नाही करणार असं पण, मी सकाळ पासून पाहतोय तुला, तुझं लक्ष च नव्हतं वर्गात आणि राहिला प्रश्न 'ती' चा तर, आपण आज जाऊन पाहू ती माळावर दिसते का.., जर दिसली तर बघू, नाही दिसली तर त्याचा ही जास्त विचार नको करुस. चल, भूक लागली आहे मला. डब्यात आई ने तुझ्या आवडीची चण्याची भाजी दिली आहे मस्त चमचमीत ! चल खाऊ." असं म्हणून दोघे ही वर्गात गेले. तास संपले, महाविद्यालय सुटलं. ठरल्याप्रमाणे दोघे ही देवळाच्या माळावर गेले, "मला असं वाटतंय की, आपण नको यायला पाहिजे होतं इकडे, चल जाऊ परत," निनाद जरासा अस्वस्थ होऊन सांगू लागला. कुणाल ने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, " थांबू थोडा वेळ, पाहू येतेय का ती." खरं तर इतक्या वर्षात निनाद ला एका मुली साठी इतकं अस्वस्थ झालेलं कुणाल ने कधी पाहिलं च नव्हतं. 
      संध्याकाळ होतं आली होती. आभाळ रंग बदलू लागलं होतं, पण 'ती' छत्रीतली मेनका काही दिसेनाच. शेवटी मग नाही नाही म्हणता निनाद ने हट्ट च धरला घरी परत जायचा, कुणालकडे दुसरा पर्याय सुद्धा नव्हता. दोघे ही घरी जायला निघाले, जाता जाता न राहून कुणाल ने निनाद ला विचारलंच की, "तुझ्या डोक्यात नक्की काय सुरू आहे. ह्या वयात एखादी मुलगी आवडणं साहजिक आहे, इतका कसला विचार करतोयस..?" निनाद थांबला आणि म्हणू लागला, " हे सगळं साहजिक आहे मला ही समजतंय पण; ज्या मुलीचा चेहरा ही पहिला नाही मी, त्या मुलीचा इतका विचार का करतोय मी, ह्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये रे ! आणि..., खरं तर तिचा विचार करण्यापासून मी स्वतःला थांबवू पाहतो पण नाही रे, जमत च नाही आहे, ती जातचं नाहीये डोक्यातून. पहिल्यांदाच होतंय असं, कळत नाहीये मला काय करू." निनादचा हा गोंधळ सोडवणं कुणाल ला काही जमत नव्हतं, दोघे ही शांत उभे होते. "चल जाऊ घरी, अभ्यास करायचा आहे." असं म्हणून निनाद घराच्या दिशेने चालू लागला, कुणाल ही त्याच्या सोबत च घरी गेला. रात्र गेली, सकाळ झाली. तास कमी असल्याकारणाने महाविद्यालय आज लवकर सुटलं. आज संध्याकाळी सगळ्यांनी चहाच्या टपरी वर भेटायचं ठरवलं. सगळे जमले पण निनाद काही दिसत नव्हता. मग कुणालने त्याला कॉल केला, त्यावेळी निनाद झाडाखाली उभा होता.
 निनाद ने कॉल उचलला, "हो, येतोय मी अर्ध्या रस्त्यात आलोय" असं म्हणून टपरीवर जाऊ लागला. समोरून त्याला सावनी ताई येताना दिसली, " काय रे.., आज एकटाच..? कुणाल आणि बाकी सगळे कधी चे थांबलेत तिकडे " असं विचारू लागली. " आज जरा उशीर झाला गं ताई, हे काय चाललोय आता " असं म्हणून तो पुढे जाऊ लागला. 
      'सावनी' ही कुणाल ची मोठी बहीण. निनाद देखील तिला कुणाल सारखा च होता. निनाद थांबला आणि पाठीमागे पाहून " ताई ऐक ना " असं सावनी ना म्हणाला. सावनी ने " बोल ना काय झालं ? " असं विचारलं. निनादला काय बोलावं सुचत नव्हतं मग तिने च विचारलं, "सगळं ठीक आहे ना ?." 'हो' अश्या अर्थाने मान डोलावून निनाद तिला सांगू लागला, " हो म्हणजे तसं सगळं च ठीक आहे पण, हल्ली थोडं विचित्र वाटतंय. अभ्यासात लक्ष लागत नाहीये, कळत नाहीये काय करू." सावनी त्याच्याकडे पाहून हसू लागली आणि म्हणाली, " कुणाल ने सांगितलं मला, तू अस्वस्थ झाला आहेस ते पण, कारण काही सांगितलं नाही." निनाद हसू लागला आणि म्हणाला, " इकडेच दोन दिवसांपूर्वी कोण तरी दिसली होती मला, छत्रीमुळे मला तिचा चेहरा दिसला नाही, पण तरीही तिचा विषय काही डोक्यातून जात नाही आहे माझ्या. तुला सांगू का.., खरं तर मुद्दा असा आहे की, हे सगळं असं का होतंय ह्याच उत्तर मिळत नाहीये मला त्याचा जास्त त्रास होतोय आणि मला स्वतःला थांबवता ही येत नाहीये तिचा विचार करण्यापासून." सावनी ने सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाली, " निनाद रिलॅक्स ! ज्या वयात तुम्ही आता आहात, त्या वयात असं होणं खूपच साहजिक आहे, इतका त्रास नको करून घेऊस, ह्या पुढे ही अश्या खूप मुली दिसतील तुला, त्यांचे चेहरे ही दिसतील म्हणून तू प्रत्येकी साठी इतका अस्वस्थ होणार आहेस का..? आणि तिच्याविषयी सांगायचं झालं तर, तिने तुझं लक्ष का वेधून घेतलं तुझं तुला ठाऊक, तिच्या विषयी तुला काय वाटतं हे ही तुझं तुला च ठाऊक पण लक्षात घे अजून खूप लहान आहात तुम्ही, आता कुठे तुम्हाला जगण्याची खरी मजा कळेल. हळू हळू तरुण वयात प्रवेश कराल असे अनेक अनुभव येतील तुम्हाला, प्रत्येक गोष्टीसाठी डोक्याला इतका ताप नको देउस. आता तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे ते बघ, त्याचा विचार कर, अजून खूप काही बाकी आहे, ये तो शुरुवात है..! बाकी आता काय करायचं, कुणाला महत्व द्यायचं आणि किती द्यायचं ते तुझं तू ठरव. जिंदगी में अभी बहुत आगे जाना है।" हे सगळं ऐकून निनाद चा गोंधळ जरासा दूर झाल्याचं दिसलं. " थँक्स ताई," असं म्हणून दोघे ही आपापल्या रस्त्याने निघाले.
      निनाद टपरीवर पोहचला. मित्रांच्या गप्पा झाल्या, सगळे घरी सुद्धा परतले, निनाद आणि कुणाल त्यांच्या अंगणातल्या, आंब्याच्या चौथऱ्यावर बसून गप्पा मारत होते. निनाद ला परत पूर्वीसारखं मोकळं आणि तणावमुक्त पाहून कुणाल ला छान वाटलं. " काय रे.., भेटली वाटतं तुला, तुझी 'छत्रीतली मेनका' नाही..! म्हणजे सकाळ पर्यंत जो ताण होता तुझ्या चेहऱ्यावर तो आता ओसरल्यासारखं वाटतंय म्हणून विचारलं." असं विचारत कुणाल ने निनाद ची थट्टा केली. त्याला प्रतिउत्तर देताना निनाद म्हणाला, " 'ती' नाही भेटली पण सावनी ताई भेटली, तिच्याशी बोललो तर आता जरा मोकळं वाटतंय." कुणाल ने विचारलं, "का ? असं काय बोलली ताई..?" निनाद उत्तरला, "जास्त काही नाही रे ! ह्या सगळ्याकडे पहायचा दृष्टीकोन बदलला माझा. आज दुपार पर्यंत 'ती कोण आहे' याचं उत्तर शोधत होतो, दुपार नंतर 'मी कोण आहे' याचं उत्तर शोधावसं वाटतंय, इतकंच !" एवढं बोलून दोघेही घरी गेले. त्या संध्याकाळ पासून निनाद चा प्रवास सुरु झाला.. ' मी कोण ' हे शोधण्याचा..
               
                     - ©आदिती जाधव.

शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१

छत्रीतली मेनका । ( भाग १ )

सायंकाळची वेळ होती, निनाद एका झाडाखाली उभा होता. तेवढ्यात त्याला कुणाल चा कॉल आला. बरोबर दोन दिवसांआधी निनाद त्या झाडाजवळून सायकल घेऊन ठरलेल्या ठिकाणी त्याच्या मित्रांना भेटायला जात होता.., ओझरता पाऊस पडतं होता.., सायकल चालवता चालवता त्याच लक्ष रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या एका मुलीकडे गेलं. तिचा चेहरा छत्री मुळे झाकला गेला होता पण निनाद मात्र सारखा तिला पाठी वळून वळून पाहत होता. जशी सायकल पुढे जाऊ लागली तशी ती नजरे आड झाली. निनाद त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी म्हणजेच रस्त्याच्या कडेला असलेली चहाची टपरी तिकडे जाऊन पोहचतो. सगळे मित्र मंडळी गप्पा टप्पा मारतात, एक - एक कप चहा घेऊन सायकल वरून मस्ती करत करत आपापल्या घरी जातात. 
      निनाद, तोरस्करांचा एकुलता एक मुलगा. त्याचे बाबा तालुक्यातल्या महाविद्यालयात प्राध्यापक आणि आई ग्रंथपाल, त्यामुळे निनाद ला अभ्यासाची, पुस्तकांची फार आवड. तसा जरा हट्टी पण समजूदार; मनाने निर्मळ पण थोडासा रागीट स्वभावाचा. रात्र झाली होती, घराच्या पाठी असलेल्या रातराणी चा सुगंध सगळीकडे पसरला होता. निनाद ओट्यावर गणितं सोडवत बसला होता, तेवढ्यात त्याला पटकन ती छत्री घेऊन उभी असलेली मुलगी आठवली..., कोण असेल ती ? त्याला प्रश्न पडला. क्षणभरात च "काय चाललंय माझं, गणितं सोडवायची बाजूला ठेवून तिचा विचार करत बसलोय'', असं म्हणून त्याने तेवढ्या पुरतं तिला टाळलं आणि गणितं सोडवायला सुरुवात केली. थोड्याच वेळात त्याच्या आई ने त्याला हाक मारली, ' निनाद.., जेवायला ये'. जेवता जेवता तोरस्करांच्या घरी नेहमी प्रमाणे गप्पा-गोष्टी झाल्या. शतपावली करायला निनाद बाहेर अंगणात गेला आणि कुणाल ला हाक मारली, कुणाल ने, ' आलो रे..' असा सूर लावत प्रतिउत्तर दिलं. कुणाल आणि निनाद शेजारी च राहत. कुणाल हा निनाद चा बालपणी चा अगदी जवळचा आणि खास मित्र. कुणाल येताच दोघांच्या गप्पा सुरु झाल्या आणि त्या गप्पांच्या मध्ये निनाद बोलता बोलता बोलून गेला, ' आज मी कट्टयावर येत होतो ना तेव्हा देवळाच्या माळावर एक मुलगी दिसली रे मला, हलका पाऊस पडत होता त्यात ही छत्री घेऊन उभी होती, त्यामुळे चेहरा काय दिसला नाही.' कुणाल हसत हसत निनाद ची थट्टा उडवू लागला आणि म्हणाला, '' गेल्या महिन्यात १७ वर्ष पूर्ण झाली आपल्याला, आता पर्यंत, 'तुला कोणत्या मुली चा चेहरा पाहायला नाही मिळाला', अशी तक्रार करताना कधी ऐकलं च नव्हतं. सगळं ठीक आहे ना भावा.'' असं म्हणून कुणाल हसू लागला. यावर काही च न म्हणता निनाद देखील हसू लागला. 
      सकाळ झाली, दुसरा दिवस उजाडला. सगळी पोरं महाविद्यालयात जाण्यासाठी बस स्थानकाजवळ उभी होती. बस आली, कुणाल आणि निनाद एकत्र च बसले होते, कुणाल ने अचानक त्या मुली चा विषय काढला तर निनाद, '' जाऊदेत असेल कोणी तरी,'' असं म्हणून दुर्लक्ष केलं. महाविद्यालयाच्या बस स्थानकाआधीच बस स्थानक आलं आणि गर्दी ओसरली; तेवढ्यात एक मुलगी बस मध्ये चढली. निनाद च अचानक लक्ष गेलं, त्याने तिला क्षणभर डोळ्यात टिपलं आणि स्वतःला च विचारू लागला..,' ही तीच आहे का, जी मला काल रस्त्याच्या पलीकडे दिसली होती..' निनादला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळे पर्यंत तिने त्याच्याकडे पाहिलं ! आणि मग काय तर, पहिल्यांदा दोघांची नजरेला नजर  भिडली..., तेवढ्यात गतिरोधकाने मध्ये च नाक खुपसलं आणि दोघे ही भानावर आले. निनादच्या डोक्यात राहून राहून एक च विचार घोळ घालत होता.., रस्त्याच्या पलीकडे पाहिलेली 'ती' आणि बस मधली 'ती' एकच की वेगवेगळ्या...?? बस थांबली महाविद्यालयाच बस स्थानक आलं, सगळी पोरं महाविद्यालयात गेली. वर्गात सगळे गप्पा टाकत बसले होते, निनाद मात्र एकटा बसून कसल्याशा विचारात मग्न होता. त्याच्या मित्रांनी त्याला विचारलं ही पण तो काही सांगेना. प्राध्यापक आले सगळी पोरं आपापल्या जागे वर जाऊन बसली. शिकवणी सुरू असताना कुणाल ने हळू च निनाद ला विचारलं, '' तू अजून ही तिचा च विचार करतो आहेस का..?'' निनाद ने काहीही न बोलता फक्त नाही अश्या अर्थाने मान डोलावली. पुढचा काही वेळ दोघांमध्ये शांततेत गेला. पहिला तास संपला आणि निनाद कुणाल ला तसाच बाहेर घेऊन आला. ''आज बस मध्ये एक मुलगी आलेली, आपल्या कॉलेज च्या आधी च्या बस स्थानक तिकडे ती बस मध्ये चढली; मी पाहिलं तिच्याकडे मला ती, त्या रस्त्यापलीकडच्या छत्रीतल्या मुली सारखी वाटली पण मी तिचा चेहरा पहिला च नव्हता.., मला नक्की माहीत नाही ती तीच आहे की अजून कोणी..'' निनाद ने कुणाल ला एका श्वासात सगळं कोडं सांगितलं. कुणाल त्याच्या कडे पाहतच राहिला.

*क्रमशः

                 - ©आदिती जाधव.

शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१

कुमारीकेची सौभाग्यवती होताना...

आज आडिवलेकरांच्या घरी पाहुण्यांची गर्दी जमली होती. घरभर खमंग वास सुटला होता. घरासमोर मोठा मंडप उभारला होता. सगळीकडे आनंदाचा बहर आला होता; का नाही येणार म्हणा.., दोन दिवसांनी आडिवलेकरांच्या लाडक्या लेकीचा म्हणजेच रेवती चा लग्नसोहळा पार पडणार होता. तसं काही कारणास्तव रेवती च लग्न खूप घाई गडबडीत ठरलं पण; मुलाकडची मंडळी ही आडिवलेकरांच्या, मित्राच्या नात्यातले होते, त्यामुळे आडिवलेकर साहेबांना जास्त काळजी वाटत नव्हती, शिवाय त्यांनी सगळी शहानिशा करून चं लग्नाला होकार दिला होता. सगळीकडे लगीनघाई सुरू होती. पण! रेवती मात्र काळजीत दिसत होती. "रेवती, रेवती.., अगं कुठे आहेस ? " रेवती ची काकी तिला शोधत तिच्या खोलीत आली. पाहते तर काय सगळीकडे पसारा होता आणि रेवती मात्र एका कोपऱ्यात शांत बसली होती. 
      'रेवती' ही आडिवलेकर घराण्यातली एकुलती कन्या ! तिला एक सख्खा मोठा भाऊ आणि दोन चुलत भाऊ होते, त्यामुळे घरात सगळ्यांचाच तिच्यावर खूप च जीव . रेवती ही सगळ्यांना मायेने जपत होती, तिचा, तिच्या काकी - काका वर खूप जीव होता. तिची तिच्या काकी सोबत पक्की आणि अतूट मैत्री झाली होती. रेवतीची काकी तिच्या खोलीत आली, रेवती ला काकी ने दोन - तीन वेळा हाक मारली पण तीच लक्ष च नव्हतं. काकी ने रेवतीच्या डोक्यावरून मायेने हाथ फिरवला आणि " काय झालं " असं विचारलं, काकी चा स्पर्श होताच रेवती भानावर आली आणि, "काही नाही काकी.., सहजच विचार करत होती." असं बोलू लागली, हे ऐकताच काकी हसू लागल्या आणि रेवतीच्या बाजूला बसल्या. रेवती काकी च्या मांडीवर डोकं ठेऊन रडू लागली. काकीं नी तिला धीर दिला अन् विचारू लागल्या की, " काही मनाविरुद्ध होतंय का तुझ्या..? नाही करायचं आहे का तुला हे लग्न..?" तेवढ्यात रेवती उठून बसली, त्यांच्या कडे पाहून डोळे पुसत म्हणाली.., "नाही काकी.., असं काहीच नाही! सगळं छान होतंय फक्त सगळं इतक्या लवकर झालं की, मला हे सगळं स्वीकारायला जरा अवघड पडतं आहे. या घराला, इथल्या माणसांना, पाठीमागच्या बागेला, आपल्या शेतीला, या गावाला सोडून जायचं.. ते ही अश्या ठिकाणी जिथे मी अनोळखी असेन ! ह्या सगळ्या विचारांनी मनात गोंधळ घातलाय. माझ्या माणसांना सोडून जावसं वाटत नाहीये. " हे सगळं काकी शांत बसून ऐकत होत्या, रेवती च बोलून झाल्यावर काकी तिला म्हणाल्या, "तुला खरंच वाटतंय का तू हे सगळं सोडून जात आहेस ? जरा नीट विचार करून सांग हा.., तू आपली माणसं सोडून जाणार आहेस की, दोन कुटुंबाना एकत्र जोडनार आहेस ? " रेवती विचारात पडली. काकी तिला स्वतःच उदाहरण देऊन समजावू लागल्या, " लग्न म्हणजे स्वतःच घर सोडून अनोळखी घरी जाणं नव्हे तर दोन कुटुंबाना एकत्र जोडण्याचा सोहळा असतो. मी जेव्हा ह्या घरात येणार होती, तेव्हा मी ही अनोळखी च होती तुमच्यासाठी आणि तुम्ही सगळे माझ्यासाठी पण, मी या घराला, इथल्या माणसांना आपलंसं केलं. ह्या घराने, इकडच्या माणसांनी मला आपलंसं केलं. आता तू ही पाहते आहेस की, हे घर इथली माणसं आणि मी एकमेकांशिवाय अपुरे आहोत." काकी च म्हणणं रेवतीला पटलं आणि चेहऱ्यावर हास्य आणत तीने काकी ला मिठी मारली. 
      लग्नाचा दिवस उजाडला. अगदी आदल्यादिवसा पासून सगळेच जोरदार तयारी करत होते. लग्नसोहळ्याला सुरुवात झाली. रेवती मांडवात आली. लग्नाच्या विधीं ना सुरुवात झाली. मंगळसूत्र गळ्यात घालता वेळी ती स्वतःशीच पुटपुटली " कुमारीकेची सौभाग्यवती होतेय, दोन घरांना एकत्र जोडतेय". 
लग्न अगदी सुखरूप पार पडलं. विधी पूर्ण झाल्या, फोटोशूट ही झाला, आता वेळ आली होती पाठवणी करण्याची. आडिवलेकर मंडळी सुखाचे अश्रू गाळत होती. रेवती चा पाय अंगणाबाहेर पडत नव्हता. तिने पाठी वळून पाहिले आणि बालपणापासून आता पर्यंतच प्रवास अगदी क्षणभरात केला. अंगणात मांडलेला भातुकली चा खेळ आज तिला नव्याने खेळावासा वाटत होता. लंगडी, खो- खो, लगोरी, लपंडाव, पकडापकडी हे सगळे खेळ खेळलेल्या अंगणात तिला तिचं बालपण सुस्पष्ट दिसत होतं. सगळ्यांनी तिला कुशीत घेऊन नवीन आयुष्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या. जाता जाता रेवतीने पुन्हा एकदा तिच्या काकी ला मिठी मारली. आणि रेवती सासरी निघाली...!

                     - ©आदिती जाधव.

बुधवार, १६ जून, २०२१

ती स्वतःलाच परकी झाली, अगदी कायमचीच !

रात्र झाली होती. तो अर्धा चंद्र किती छान दिसत होता. स्वरा रात्रभर त्या चंद्राकडे पाहत, चांदण्यांमध्ये रमून गेली होती. तिला रात्र फार आवडायची. चंद्र, तारे, चांदण्या सगळे च तिच्या खूप जवळचे ! घराच्या अंगणातली रातराणी तर तिचा जीव की प्राण ! पण, एके रात्री सगळं तिला परकं झालं, काहीच आवडेना झालं. स्वरा, ६ वर्षांची नाजूक पोर, जी सगळ्यांमध्ये रमायची पण हरवून जायची ती फक्त स्वतःच्या जगात. स्वतःशी सवांद साधायला, स्वतःमध्ये हरवून जायला तिला खूप आवडे. पण, त्या रात्री ती नेमकी स्वतःला परकी भासली, त्या रात्री चंद्र, तारे, चांदण्या, अंगणातली रातराणी सगळं च तिला परकं वाटलं.
         रात्रीचे अकरा वाजले होते. घराचा दरवाजा कोणी तरी ठोकवल्याचा आवाज आला. तिने आधीच अंदाज लावला होता की, तिचे बाबाच बाहेर दरवाजा ठोकवीत असतील. तिच्या आईने दरवाजा उघडला. स्वराचे बाबा घरात आले. हातपाय धुवून जेवायला बसले, जेवून झालं. स्वरा तशीच तिच्या खोलीत गेली आणि हातात कोणता तरी कागद घेऊन बाहेर हॉल मध्ये येत होती इतक्यात; तिला तिच्या आई चा आवाज ऐकू आला, ती क्षण भर स्तब्ध उभी राहिली. दुसऱ्याच क्षणाला तिला तिच्या बाबांचा ही आवाज ऐकू आला, ती तशीच हॉल च्या दिशेने गेली. तिने पाहिलं तर तिचे आईबाबा एकमेकांशी मोठ्या आवाजात बोलत होते, खर तर ते दोघे भांडत होते. तिला कारण समजलं नाही पण; तिच्या बाबांनी तिच्या आईवर हात उचलेला पाहून, तिच्या डोळ्यात ढग दाटून आले परंतु ते ढग बरसायला तयार नव्हते. तिला रडायचं होतं पण डोळ्यातून पाणी च निघत नव्हतं. तिला तिच्या बाबांना सांगायचं होतं, 'नका मारू असं माझ्या आईला', परंतु तिची हिम्मत होतं नव्हती. तिला तिच्या आईला ही सांगावंसं वाटतं होतं, 'नको अशी छोट्या-छोट्या गोष्टींवरून बाबांशी भांडत जाऊस' पण, तिला ते सांगायला जमत नव्हतं. ती ओल्या डोळ्यांनी तिच्या खोलीत जाते आणि तिच्या हातातला कागद पाहत असते, ज्यावर तिने आईबाबा आणि स्वरा तिघांच चित्र काढलेलं असतं. ते पाहता पाहता ती झोपी जाते.
         ह्या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी नवीन नव्हत्या. तिचे आई-बाबा गेले २-३ महिने नेहमी भांडायचे पण आज वर तिच्या बाबांनी तिच्या आईवर कधी हात उचलला नव्हता. ६ वर्षांची पोरं ती, तिला जे घडतंय ते दिसत होतं पण समजतं नव्हतं. तिचे आईबाबा का नेहमी भांडतात या प्रश्नाचं उत्तर ती शोधू पाहत होती; ते उत्तर तिला मिळत नव्हतं. तिला ह्या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत होता. हे सगळं ती त्या चंद्राला सांगू पाहत होती सगळं काही, अन् नेमकी त्या रात्री अमावस्या होती. तो चंद्र काही तिला भेटला नाही. तिने ती रात्र चंद्राची वाट पाहत ओल्या डोळ्यांनी काढली, तो चंद्र मात्र आलाच नाही. त्या दिवशी तिला खूप एकटं वाटलं. घडत असलेल्या प्रकारामध्ये ती काहीच करू शकत नव्हती. ना ती चंद्राला शोधू शकत होती ना तिच्या आईबाबांना भांडण्यापासून थांबवू शकत होती. तिला स्वतःचाच खूप राग आला होता. ह्या सगळ्यांमुळे ती सगळ्याच गोष्टींपासून अगदी स्वतःपासून ही दुरावत चालली होती. जे घडतंय ते मुकाट्याने पाहत होती आणि रात्री खिडकी जवळ बसून रडत होती. स्वराला होणाऱ्या त्रासाबद्दल तिच्या आईबाबांना कल्पना देखील नव्हती. ते दोघे त्यांच्यामध्ये असलेल्या वादामुळे स्वराचा विचार देखील करत नव्हते, आणि याचच तिला खूप दुःख होतं

         एके दिवशी तिने ठरवलं जाऊन आईबाबांना सरळ विचारायचं, 'तुम्ही का भांडता सारखे सारखे?' नेहमी प्रमाणे तिचे बाबा रात्री अकरा वाजता घरी आले आणि परत तिच्या आईबाबांचं भांडण सुरू झालं. स्वराला राहवेना, तिने शेवटी ओरडून तिच्या आईबाबांना विचारलं, 'तुम्ही का नेहमी भांडता?', हे ऐकून तिच्या आईने रागात तिच्या गालावर खूप जोरात मारलं आणि म्हणाली , 'तुझ्यामुळे होतंय हे सगळं, नसती जन्मला आलीस तर बरं झालं असतं.' हे ऐकून स्वराच्या बाबांचा राग अनावर गेला  आणि त्यांनी परत तिच्या आईवर हात उचलला. स्वरा मात्र स्तब्ध उभी होती, तिच्या कानात आईच वाक्य घुमत होतं. तिला काहीच कळलं नाही. ती अजूनही तिथे स्तब्ध उभी होती, पण हे कुणाच्या लक्षात आलं नाही. तिचे आईबाबा भांडणात इतके गुंतले होते की, स्वरा ते पाहून तिच्या खोलीत गेली, आणि हे त्यांना कळलं देखील नाही. ती रात्रभर विचार करत होती. तिच्या डोक्यात एकच प्रश्न होता आणि तो म्हणजे, 'खरंच ! हे सगळं माझ्यामुळे होतंय का ?'
         तिची आई रागात सहज बोलून गेली पण, स्वराच्या मात्र ते क्षणभरातच मनात खोलवर रुतून गेलं. आज ह्या गोष्टीला दोन दिवस होतील. ह्या दोन दिवसात स्वतःमध्ये हरवणारी स्वरा, स्वतःचा तिरस्कार करू लागली. आईबाबांच्या भांडणाला स्वतःला दोषी ठरवत होती, तिला स्वतःचा खूप राग येऊ लागला. तिला चंद्र, तारे, चांदण्या इतकं च काय तर जीव की प्राण असणारी तिची रातराणी देखील नकोशी वाटू लागली. रागारागात स्वराला सहज बोलून गेलेली तिची आई दुसऱ्याच दिवशी विसरून सुद्धा गेली; पण त्या एका वाक्यामुळे स्वरा मात्र स्वतःला परकी झाली ती कायमचीच !

                 - आदिती जाधव.



#bol_ratraniche #swara #मराठी #मराठीकविता #मराठीसाहित्य #मराठीलेख #मराठीकथा #लघुकथा #रात्र #चंद्र #तारे #चांदण्या #रातराणी #आईबाबा #राग #चित्र #परकेपणा 

गुरुवार, १० जून, २०२१

असाच एक पावसाळा, शेतकऱ्याच्या घरातला...

        जून महिना...! पावसाळा सुरू झाला होता. तसे सगळेच पावसाची वाट पाहत होते. शेतकरी तर डोळे ढगांकडे लावून बसले होते. वातावरण ढगाळ होत चाललं होतं. सगळ्यांना वाटलं आता पाऊस येणार म्हणून गावकरी ज्यांची-त्यांची कामे संपवून घरी परतू लागले होते. वेळ संध्याकाळची होती. राघव त्याच्या घराच्या अंगणात येऊन, आई-बाबांची वाट पाहू लागला. तिकडे शेतात राघव ची आई, राघवच्या बाबांना सांगू लागली, 'रवांदेत ता काम आता, चला आटपा लवकर, माझो लेक रघु ( राघव ला घरी प्रेमाने रघु नावाने बोलावीत) वाट बघत असत, तुमची आय पण तिकडं मागल्या दारावर बसून असत.' तेवढ्यात रघुचे (राघव) चे बाबा शेतातून बाहेर आले आणि रघुच्या आई ला म्हणाले, 'पोटापाण्यासाठी करूक लागता गो, जरासो एळ झालो तर त्याका काय व्हता, माझो लेक अन् माझी आय घेतं ली समजून माका.' असे म्हणून ते दोघे ही घराच्या दिशेने वाटचाल करू लागले. तिकडे घरी रघुची आजी रघु ला, 'आय न बाप येवू ची एळ झाली पाण्याखाली इस्तेव घाल' अशी पाटच्या दारावरून सांगू लागली. 
         संध्याकाळी सहा च्या सुमारास रघु चे आई-बाबा घरी आले. 'इलसं काय र पोरा..?' असं विचारून आजी ने रघुच्या बाबांचं स्वागत केलं. 'इलयं, इलयं' असं म्हणून रघुचे बाबा उत्तरले. रघुचे बाबा हात-पाय धुवून बाहेर येताचं रघु त्यांच्या पाठी घरभर फिरून दिवसभरात काय काय घडले ते सांगू लागला. त्याने, त्याच्या मित्राला, त्याच्या भावाच्या सायकल बद्दल बोलताना ऐकलं होतं आणि हे तो त्याच्या बाबांना सांगणार इतक्यात ढगांच्या गडगडण्याचा आवाज कानी ऐकू आला.., क्षणभरासाठी तो थांबला, सगळेच शांत झाले. आता पाऊस येणार, वीज जाणार, घरात अंधार होणार म्हणून रघुची आई रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागली. पाऊस आला तर गाई-बैलांचा चारा भिजेल अन् मग ते उपाशी राहतील म्हणून राघूचे बाबा चाऱ्यावर ताडपत्री घालायला गेले. रघूचं बोलणं कोणी ऐकत च नव्हतं म्हणून त्याला राग आला न तो जाऊन ओट्यावर बसला. क्षणार्धात पावसाने हजेरी लावली, सरीवर सरी बरसू लागल्या. अचानक रघुच्या डोक्यावर पाण्याचे थेंब पडू लागले, त्याने वर पाहिलं तर घरावरच्या छपरातून पाण्याचे थेंब गळत होते. तो उठला आणि आईला सांगायला गेला तर तिकडे ही छपराला भोकं पडून त्यातून पाणी गळतं होतं.
             रात्रीच्या जेवणाची तयारी करता करता रघूची आई जिथं-जिथं छप्पर गळत होतं तिथं-तिथं घरातली भांडी आणून ठेवत होती. रघु मात्र उभा राहून सगळं पाहत होता. तेवढ्यात घरच्या पाठीमागे रघुचे बाबा रघुला बोलावतं आहेत हे रघुला कळताच तो तसाच धावत घराच्या पाठीमागे गेला. त्याने पाहिलं, त्याचे बाबा गोठ्यात उभे होते, तिथे ही जागोजागी पाणी गळंत होतं. रघुचे बाबा रघुला घरातून भांडी आणायला सांगत होते, तो घरात आला आणि भांडी शोधू लागला पण सगळी भांडी घरात छप्पर गळत होतं तिथं लावली होती. त्याने जाऊन हे त्याच्या बाबांना सांगितलं. गाई-गुरं भिजू नयेत म्हणून त्याच्या बाबांनी हाताला मिळतील त्या पिशव्या, कागद सगळं भर पावसात गोठ्याच्या वर जाऊन जिथं-जिथं पाणी गळतं होतं तिथं-तिथं लावल्या. ते कागद, पिशव्या वाऱ्याने उडून जाऊ नयेत यासाठी त्यावर दोन-दोन दगड ठेवले. रघु हे सगळं लांबून च पाहत होता. त्याची आई पावसापासून स्वतःचं घर वाचवत होती, सांभाळत होती, सावरत होती. अन् त्याचे बाबा ज्यांच्यामुळे त्याचं घर चालतं त्यांचं घर पावसापासून वाचवत होते. कसा-बसा पाऊस थांबला आणि रघुच्या घरी रात्री च जेवण झालं. झोपायची तयारी सुरू झाली पण; रघुची आई मात्र परत पाऊस येईल आणि छप्पर गळेल या चिंतेत जागीच राहिली. शेवटी पाऊस आला अन् छप्पर गळू लागले. रघुची आई परत सगळी भांडी आणून जागजागी ठेऊ लागली, रघुचे बाबा ही झोपेतून उठून रघुच्या आई ला मदत करू लागले. 
             हे पाहून त्याला लगेच च सकाळी त्याचा मित्र, त्याच्या भावाच्या सायकल बद्दल बोलत होता ते आठवलं, ते बाबांना ऐकून घ्यायला पावसामुळे वेळ मिळाला नाही आणि त्यामुळे त्याला आलेला राग, हे सगळं त्याच्या डोळ्या समोर आलं. त्याला रहावलं नाही, डोळयातून अश्रू वाहू लागले त्यामुळे त्याला घराच्या छप्परातून टपकणाऱ्या पावसाचे थेंब त्याला दिसेनासे झाले. आज संध्याकाळी जेव्हा रघुचे आई-बाबा घरी आले तेव्हा रघुला त्यांना सांगायचं होतं की, 'रघुच्या मित्राचा मोठा भाऊ त्याची जुनी सायकल विकणार आहे अन् ती सायकल रघु ला हवी आहे,' पण; घरची परिस्थिती पाहता स्वतःची अनाठायी निर्माण झालेली इच्छा आणि आईबाबांचे कष्ट यामध्ये त्याला महत्वाचं कोण हे कळून आलं. रघुने त्याची इच्छा मनातच ठेवली अन् ओल्या डोळ्यांनी झोपी गेला. 
             

     
                                            - आदिती जाधव.


#पावसाळा #शेतकरी #घर #छप्पर #इच्छा #सायकल #मराठी #मराठीसाहित्य #लघुकथा #महाराष्ट्र #मालवण #आई #बाबा #आजी #अंगण #रात्र  #अश्रू  #पावसाचेथेंब

Featured Post

पत्रास कारण की...

प्रिय तू ,    आज खरंतर इतक्या वर्षात पहिल्यांदा तुला पत्र वगैरे लिहितेय, थोडं दिल खुलास होऊन सांगतेय. तुझी तक्रार असावी माझ्याकडून की, मी का...