लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१

तीन-दोन-पाच

जून महिन्यात काही कारणास्तव गावाला जाऊन आली. तसे आम्ही सगळेच गेलो होतो गावी पण पप्पा, मोठे पप्पा आणि बाबी ( लहान आत्या ) लवकर मुंबई ला आले. आम्ही गावाला च थांबलो होतो. पावसाचे दिवस, बाहेर चिखल झाली होती सोबत ओझरता पाऊस होताच.. अंकल, दादा, बाबू आणि वाडीतले इतर पुरुष मंडळी कुरल्या पकडायला गेले होते. मी आणि दीदी ओट्यावरच बसून होतो. आम्हा दोघींना ही खूप वैताग आला होता. बारक्यापोराचे ऑनलाईन क्लासेस सुरू झाले होते, ती त्यात व्यस्त. बसून बसून आम्ही मग एक पत्त्यांचा डाव खेळायचा ठरवला, तेवढ्यात मम्मी, मोठी मम्मी जेवण बनवून बाहेर ओट्यावर येऊन बसल्या. आम्ही पत्ते काढून ते पिसत च होतो, इतक्यात मोठ्या मम्मीलाही आमच्या सोबत खेळायची इच्छा झाली. आता काय खेळायचं..? तीन-दोन-पाच..!
       खेळ सुरू झाला. पहिल्याच डावात माझ्यावर पाच, दीदी वर तीन आणि मोठ्या मम्मी वर दोन हात आले. जेव्हा हे तीन पत्ते उघडले तेव्हा हास्याचा कल्लोळ उडाला.., पहिल्याच डावात मम्मी वर दोन हात आलेले पाहून मी आणि दीदी तर चकित च झालो. बरं, खेळ सुरू झाला, हळू हळू हात घेतले. मोठी मम्मी पहिल्यांदा च तीन-दोन-पाच खेळत होती पण ती इतकं भारी खेळत होती की मला आणि दीदी ला तूर्तास वाटलं होतं की, ही आता आमचे हात खेचणार ! आणि तिने ते खेचले सुद्धा ! माझ्यावर पाच असताना तिने माझे दोन हात अन् दीदी वर तीन हात असताना तिचा एक हात मम्मी ने खेचला. आणि ह्या पहिल्या डावातच तिने आमच्यावर हात चढवले.., ते बघून माझी मम्मी सुद्धा चकित झाली. मी आणि दीदी तर मोठ्या मम्मी कडे फक्त बघत होतो आणि ती आमच्याकडे बघून हसत होती. दुसऱ्या डावात आम्ही ते हात फेडले, आता माझ्यावर दोन, दीदी वर पाच आणि मम्मी वर तीन हात होते. ह्या खेपेला मम्मी ने एकटीने दीदी चे दोन हात खेचले. ते सुद्धा फिटले मग पुढच्या फेरीस मम्मी वर पाच, माझ्यावर तीन अन् दीदी वर दोन हात होते. हा डाव जरा रंगला, ह्या वेळी मम्मी ने आमचे नाही आम्ही मम्मी चे हात खेचले. त्यानंतर मम्मी थोडीशी चिडली सुद्धा पण ह्या वेळी अशी गम्मत झाली अन् मग सगळेच हसू लागलो. आम्ही खेळता खेळता बारक्यापोराने आमचे सहा - सात तरी फोटोस् काढले असतील त्यातला हा एक फोटो 
       आता मुंबई ला येऊन जेव्हा पत्यांकडे लक्ष जातं तेव्हा-तेव्हा हा क्षण डोळ्यांपुढे येतो. त्या दिवशी पत्ते खेळायचा मम्मी चा पहिला वहिला अनुभव तिला इतका आवडला की तिने तीन-दोन-पाच हा खेळ बऱ्याचदा खेळला. तशी ती आमच्या घरातली मोठी सून आहे पण कधी कधी आमच्यातलीच लहान-सहान चेडू भासते. सध्याच्या परिस्थितीत कसला न कसला त्रास तर सगळ्यांना च होतोय पण ह्या काळात कुटुंबाशी पुन्हा एकदा नव्याने एकरूप होता आलं. जवळपास दोन-तीन वर्षांनंतर आम्ही सगळे असे एकत्र भेटलो होतो, एकत्र बसून गप्पा टाकत होतो. पत्त्यांचे डाव रंगवताना एकमेकांसोबत नव्याने रंगत होतो. आता सगळेच वाट पाहतोय परत गावाला जायची आणि ओट्यावर बसून पत्त्यांचे डाव मांडायची.
       - आदिती जाधव.


#मराठी #मराठीसाहित्य #अनुदिनी #कोकणातलंघर #पत्त्यांचाडाव

बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

भाग्यवंत आम्ही रुपारेल चे !

        आज माझ्या डिग्री कॉलेज चा पहिला दिवस होता. साहजिक च, आवडत्या कॉलेजमध्ये, आवडते विषय म्हंटल्यावर पहिला दिवस छान च जाणार आणि गेला सुद्धा. काल च ओरिएंटेशन झालं. डिग्री कॉलेजमध्ये पुढील तीन वर्ष काय अभ्यासक्रम असेल, परीक्षा कश्याप्रकारे होतील आणि कोणते कोणते उपक्रम असतात, ते कश्याप्रकारे पार पडतात. अश्या सगळ्याच गोष्टींबद्दल थोडी थोडी माहिती दिली. एकंदरीत डिग्री कॉलेज ची थोडक्यात ओळख करून दिली. अर्थात सध्याच्या परिस्थितीत सगळं च ऑनलाईन सुरू आहे, त्यात आमचं कॉलेज ही आलंच ते ही ऑनलाईन च ! मुंबई मधलं डी. जी. रुपारेल कॉलेज ( D. G. RUPAREL COLLEGE OF THE ARTS, SCIENCE AND COMMERCE ) मी माझं ज्युनिअर कॉलेज इथे च पूर्ण केलं. आता डिग्री कॉलेज सुद्धा इथेच. म्हणा इतकी भव्य आणि सुंदर वास्तू कोणाला सोडून जाविशी वाटेल. डी. जी. रुपारेल कॉलेज, मी ज्युनिअर कॉलेजच्या ऍडमिशनसाठी पहिल्यांदा या वास्तूत पाऊल टाकलं होतं. त्यावेळेस मला समजलंच नाही मी कुठून आत आली आणि कुठून बाहेर पडली. खरं तर तेव्हा मी फ्रंट गेट ( माटुंगा रोड स्टेशनच्या बाहेर चा गेट ) मधून आत आली आणि बॅक गेट ( दादर जवळचा गेट ) मधून बाहेर पडली पण; हे मला कॉलेज सुरू झाल्यानंतर माहीत पडलं. 
           कॉलेज सुरू झालं, मग हळू हळू कॉलेज ची ओळख झाली, नवनवीन मित्र-मैत्रिणींशी ओळख झाली. कॉलेजमधले कट्टे, रुपांगण सगळंच ओळखीचं आणि जवळच झालं. कॅन्टीन, कॅम्पस, आर्टस् बिल्डिंग, सायन्स बिल्डिंग, सगळंच खूप खूप भारी वाटलं होतं आता ही वाटतं. आमचं कॉलेज सुरू झालं आणि ८ महिन्यांनी लॉक डाउन पडलं पण, या आठ महिन्यांत कॉलेज चा इतका लळा लागला की, पुन्हा कधी रुपारेल मध्ये जातोय असं वाटत होतं. तसं कॉलेजच्या कामासाठी १ - २ वेळा जाणं झालं होतं पण तात्पुरतं च ! लगेच जाऊन लगेच घरी आलो. जेव्हा कॉलेज नियमितपणे सुरू होतं, तेव्हा आल्यावर आधी १२ आर्टस् मध्ये जाऊन डबा खायचा मग लेक्चर ला बसायचो, त्यांनतर मधल्या सुट्टीत कॅम्पसमध्ये फिरायचो, कॅन्टीनमध्ये जाऊन तिकडचे पदार्थ खायचो, खूप फोटोस् काढायचो आणि मग कॉलेज सुटलं की ट्रेन साठी धावत पळत सुटायचो. लेकचर्स ऑफ असले की कॅम्पसमध्ये बसून मित्र-मैत्रिणींशी गप्पा टाकायच्या. कधी कधी स्टडी रूम मध्ये जाऊन अभ्यास करायचा, तसं तिथे अभ्यास कमी पण गप्पा जास्त रंगायच्या. रुपारेल मधलं वातावरण इतकं छान आहे की, अभ्यास करताना मन शांत आणि प्रसन्न राहतं. कधी कधी तर लेकचर्स नसले तरी कॉलेजमध्ये जायचो. या वास्तू सोबत, इथल्या लहान सहान प्रत्येक गोष्टी सोबत एक वेगळंच नातं तयार झालंय. जे आम्हाला कायम भावनिकदृष्ट्या एकमेकांशी जोडून ठेवतं.खरं तर या लॉक डाउन मुळे सगळं च ऑनलाईन सुरू आहे. त्यामुळे आता डिग्री कॉलेज सुद्धा ऑनलाईनच. घरी बसून लेकचर्स अटेंड करायला जरासा कंटाळा येतोच, जर आता कॉलेज सुरू असतं तर किती मज्जा आली असती. 
           सकाळी रुपारेल खूप सुंदर आणि मनमोहक दिसतं. लॉक डाउन नसतं तर ते दृश्य रोज पहायला आणि अनुभवायला मिळालं असतं. सकाळसकाळी पारिजातकाचा सुगंध चोहिकडे दरवळतो आणि त्याचा तो सडा इतका आकर्षक आणि सुंदर दिसतो की अक्षरशः डोळे तृप्त होतात. जर एका वास्तूमुळे दिवसाची सुरुवात इतकी सुंदर आणि छान होणार असेल तर ती वास्तू कोणाला नाही आवडणार.. खरंच भाग्यवंत आम्ही रुपारेल चे ! रुपारेल ची खरंच खूप आठवण येतेय..., जावसं वाटतंय त्या वास्तूत, ती नयनरम्य सकाळ, तो मंत्रमुग्ध करणारा परिजातकाचा सुगंध सगळं च पहावंस अन् अनुभवावंस वाटतंय. लॉक डाउन कधी संपतोय आणि आम्ही कधी रुपारेल मध्ये जातोय असं झालंय.. आम्ही नाही आहोत तिकडे तर सगळीकडे खूप शांतता पसरली असावी, कदाचित रुपारेल ला ही ती शांतता असह्य होतं असेल... त्याला ही आमची आठवण येत असावी... येत असेल ना त्याला ही आमची आठवण...?

                                 - आदिती जाधव.

गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१

पाटीवरचा खडू।

        आज मोबाईल मध्ये इंस्टा स्क्रोल करता करता अचानक एक किस्सा आठवला. हो ! गावालाच घडलेला.., माझा लहान भाऊ 'स्वरूप' म्हणजे च माझ्या अंकलचा मुलगा. तसा हुशार आहे पण, अभ्यास म्हंटल की, त्याला भूक लागते, झोप येते, कान दुखतो आणि बरंच काही... ओट्यावर रेंगनारा स्वरूप मला गिअरवाली सायकल चालवायला शिकवत होता. बघता बघता मोठा झाला. आमच्या घरी ' बाबू ' या नावाची पिढी जात परंपरा पुढे सरकवत 'स्वरूप' ला सुद्धा 'बाबू' टोपणनाव पडलं. संध्याकाळची वेळ होती, घड्याळाचे काटे पुढे पुढे सरकत होते. मी आणि बारकापोर ( साक्षी ) ओट्यावरच बसलो होतो. तेवढ्यात बाबू ची एन्ट्री झाली. अभ्यासाचं दप्तर घेऊन त्यातली पाटी आणि खडू काढून आमच्या समोरच अभ्यासाला बसला. अंक लिहायचे ठरलं. पाटीवर रेषा मारायला पट्टी सापडत नव्हती, शेवटी काय तर पुस्तकाच्या आधारानेच रेषा मारल्या. मी सहजच त्याच्या दप्तरात हात घातला आणि मला माझ्या लहानपणीचा सगळ्यात आवडता खाऊ सापडला, 'पाटीवरचा खडू'.
        पाटीवरचा खडू ..., जवळजवळ सहा - सात वर्षांनंतर, त्याला बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं. मोह आवरेनासा झाला मग काय टाकला मी तोंडात. इतक्या वर्षांनंतर आजही त्याची चव काही बदलली नव्हती अगदी मातीसारखी चविष्ट. मी कधी मातीची चव घेतली नाही पण; मानवी देह..., वासावरून चवीचा अंदाज घेता येतो की. त्या क्षणाला  मी स्वर्गसुख अनुभवल्यासारखं वाटलं. दुर्दैवाने हे बाबू ने बघितलं, ' ए तू काय खाल्लसं..? खरं खरं सांग खडू खाल्लास ना..? नको खाऊस, टाकून दे आधी, तो चांगला नसतो" असं मला म्हणाला. मी त्याच्याकडे पाहत च बसली त्याच बोलून होण्याआधी मी खडू खाऊन जवळपास संपवला होता. तेवढयात काकी आल्या आणि बाबू ने, काकी ला, मी खडू खाल्ल्याचं सांगितलं. मग काय, काकी ही बोलल्या मला " खरोखर खाल्लास तू..?, खडू काय चांगला असतो..? असं कायपण खात नको जाऊस." मी फक्त मान डोलावली. क्षणभरासाठी मला कळलंच नाही की, 'मी अजून ही लहान आहे की, बाबू मोठा झालाय..?'
         खडू खाणं चांगलं नसतं माहिती आहे मला पण, त्या खडू शी अनेक आठवणी जोडल्या आहेत शिवाय, त्याची चव मला इतकी आवडते की त्यापुढे कसलाच विचार करावासा वाटत नाही. मी हट्टी आहे, थोडीशी रागीट आणि बालिशपणा माझ्या अंगात ठोसून भरलाय त्यामुळे, अंगणवाडी ते इयत्ता चौथी या वर्गांत असताना अनेकदा मित्र - मैत्रिणींशी वाद - विवाद झालेत. गट्टी करायला तर हवी मग ती कशी..? त्यावर छान तोडगा काढला होता आम्ही, 'ज्याला गट्टी करायची असेल, तो एक अख्खा खडू देईल'. आमच्यातले वाद नेहमी या पाटीवरच्या खडू ने च मिटवलेत. मग घरी आल्यावर अभ्यासाला बसताना मम्मी विचारायची, " रोज दोन खडू घेऊन जातेस, करतेस काय इतकं त्याचं..?" आता तिला कसं सांगणार, एक खडू तर गट्टी जमवण्यात हातातून जायचा आणि दुसरा अर्धा पोटात; अर्धा पाटीवर लिहिता लिहिता हरवुन यायचा. मग मी तिला काही ठराविक पण; अगदी खरी खुरी कारणं द्यायची, ती म्हणजे... "आज खूप अभ्यास होता, शुद्धलेखन लिहिलं, गणितं सोडवली, आणि किती चित्र काढली मग खडू संपला, मधल्या सुट्टीत खडू कुठे हरवला काही माहीत च नाही, मी शोधलं पूर्ण वर्गात पण नाही मिळाला,माझ्या मैत्रिणीने आणला नव्हता खडू मग तिला दिला, ती मानसी माहितीये ना तिचा खडू हरवला, मग माझ्याकडच्या खडू मी तिला दिला." माझी ही अशी कारणं ऐकून ती सुद्धा मला तितक्याच जोमाने पुन्हा पश्न विचारायची, मग मी निरुत्तर होऊन शेवटी माघार घ्यायची.
          हा खडू किती तरी वेळा निमित्त ठरलाय, शाळेचे दिवस पुन्हा पुन्हा अनुभवण्याचं. अशी खूप लहान मुलं असतील ज्यांनी कधी खडू खायचा विचार ही केला नसेल; त्या उलट आम्ही खडू हातात आला की, तो थोडासा तरी तोंडात टाकल्याशिवाय करमत नाही. काळ्या रंगाची पाटी, चविष्ट खडू, नवीन पुस्तकांचा वास, वहीच्या उजव्या बाजूच पान ह्या सगळ्या गोष्टी तेव्हापासून प्रिय होत्या त्या अगदी आतापर्यंत. कमाल वाटायची ह्या सगळ्या गोष्टींची ! असं कोणी नसावं बहुतेक.., ज्यांना ह्या गोष्टीं जवळच्या आणि आवडीच्या नाहीत. खरं तर ह्या सगळ्यांमुळे शाळेतले दिवस इतके सुंदर आणि आठवणीत राहण्यासारखे गेले. ज्या दिवसापासून शाळेत जायला लागली, त्या दिवसापासून ह्या सगळ्या गोष्टींशी पक्की मैत्री झाली. अजून ही ती मैत्री तितकीच पक्की आहे इतकी की, कधी ही न तुटणारी..!
          - ©आदिती जाधव.




#मराठी #मराठीलेख #पाटीवरचा_खडू #शाळेचे_दिवस #आठवणी  

गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

ही वाट दूर जाते..

आज खूप दिवसांनी सगळे विडिओ कॉल वर भेटलो. इंटरनेट च्या अडचणींमुळे किती वेळा तो विडिओ कॉल अडकत होता, किती वेळा कट करून परत करावा लागत होता पण; सगळे एकत्र येत आहेत म्हंटल की, ह्या उत्साहापुढे त्या इंटरनेटच्या अडचणी काही च नाहीत. खूप साऱ्या गप्पा - टप्पा रंगल्या मग चिडवा - चिडवी, उगाच च खेचा खेची असे अनेक किस्से घडले. रात्र होतेय आणि सगळ्या आठवणी डोळ्यासमोर झिम्मा खेळत आहेत. हसोळ ! माझं गाव खरं तर फक्त गाव कसलं जग आहे ते माझं. तिथे असलेलं माझं कौलारू घर, त्या घरात राहणारी माझी माणसं. सारंच कसं माझं - माझं ! हळू हळू सगळ्या आठवणी डोळ्यासमोर रंगीबेरंगी चित्र रेखाटत होत्या. ते घर, ती वाडी, तो रस्ता....!
       रस्ता..., ह्या रस्त्यासाठी अनेक खटाटोप केलेत. गाव राहीलं डोंगराच्या पायथ्याशी आणि आमची वाडी डोंगराच्या माथ्यावर, त्यामुळे कुठे जायचं असेल तर घाटी पायी उतरून जावं लागायचं, आता रस्ता झालंय आधी तिकडे फक्त पायवाट होती..., जंगलातून जाणारी ! अनेक झाडाझुडपांच्या, फुलांच्या, फळांच्या अर्थात निसर्गाच्या सानिध्यात किती तरी वेळा प्रवास केलाय याच वाटेवरून..., आता ही ती वाट तशीच आहे फक्त थोडी रुंद झाली आणि रस्त्यात रूपांतर झालं, तिकडे एक आंब्याचं झाडं आहे. जिकडे आमची चावडी रंगायची अजून ही रंगते, दगड फेकून फेकून झाडावरचे कैरी,आंबे तोडायचो आणि मग वाड्यात जाऊन प्रत्येक जण स्वतःच्या घरातून तिखट, मीठ, तेल, सूरी आणि वाटी असं एक एक साहित्य आणायचा. वाटीत ( plate ) कैरीचे बारीक फोड करायचो, त्यात तिखट, मीठ आणि तेल घालून मिक्स करून खायचो. मग घरच्यांकडून जो ओरडा पडायचा की आम्ही सगळे परत रस्त्यावर पळायचो. पण आम्ही बनवलेली मसाला कैरी डिश खाऊन इतकं भारी आणि समाधानी वाटायचं की, घरचे ओरडले तरी त्याच दुःख नसायचं. खूप धमाल उडवली आहे ह्याच वाटेवर, सुट्टीतून गावाला गेल्यावर ह्याच वाटेवरून गाव सोडून  मुंबई ला आलो, मुंबई आहे मायानगरी पण जितकं प्रेम त्या वाटेवरच्या मातीने त्या धुळीने दिलं तितकं प्रेम मुंबई च्या डांबरी रस्त्यावर कुठे..?
       ह्याच वाटेवरून सुरू केलेला प्रवास आज इथं पर्यंत आलाय..., म्हणे ही वाट खूप दूर जाते...., आता पाठीमागे वळून पाहिलं की ह्याच वाटेशी असंख्य वेळा केलेलं भांडण आठवतं, कारण काय तर.., याच वाटेवर कित्येक वेळा पडून - धडपडून ढोपर - कोपर फोडून घेतले होते. चुकी त्या वाटेची कधी च नव्हती. आम्ही च वेंधळे होतो पण याचा दोष मात्र कायम ह्या वाटेला मिळाला. कधी कधी वाटतं ही वाट सांगत असावी आम्हाला की, ' बघा, काल पडलात - धडपडलात , ढोपर - कोपर फोडून घेतले म्हणून आज इतक्या सक्षमपणे उभे आहात'. परत पुढे वळून पाहिलं की धुकं धुकं दिसत. जसं जसं पुढे जाल तसं तसं एक नवीन गुपित तुमची वाट पाहत असेल खूप साऱ्या जबाबदाऱ्या, अनेक स्वप्नं, इच्छा - आकांक्षा आणि तितकीच हिम्मत, नवनवीन सुवर्णसंधी, माणसं आणि बरंच काही असं सगळ्यांच गाठोडं घेऊन. मग वाटतं की, होय अगदी खरं! ही वाट दूर जाते..... 

            - आदिती जाधव.

#मराठी #मराठीसाहित्य #लेख #वाट #गाव #चावडी #आठवणी

बुधवार, २ जून, २०२१

मेरे ग़मों की रात का तू उजला सवेरा..

         खूप महिन्यांपूर्वी 'राहत फतेह अली खान' यांनी गायलेलं 'ये जो हल्का हल्का सुरूर है' गाणं ऐकलं होतं, त्या गाण्यातील 'मेरे ग़मों की रात का तू उजला सवेरा' ही ओळ काळजाला चर्रर्र करून गेली ! अन् सहज च आजी चा चेहरा डोळ्यासमोर आला. 
          आपल्यापैकी कोणीही किती ही मोठं झालं तरी बालपण विसरणं आज वर तरी शक्य झालेलं नाही, या नंतर शक्य होईल असं वाटतं ही नाही. आपल्या सगळ्यांनाच बालपणीच्या आठवणींमध्ये रमायला खूप आवडत असेल यात शंका नसावी. त्या वयातील ती निरागसता, तो अल्लडपणा कमालीचा असतो. ते निष्पाप मन अन् अतरंगी तन ! सगळंच कसं छान छान. मला आठवणींमध्ये रमायला खूप आवडतं तिथे पुन्हा पुन्हा जगायला ही! लहान मूल आईबाबांच्या सहवासात जास्त रमतं यात वाद नाही पण माझ्यासाठी माझी आजी जास्त जवळची आहे अजूनही! माझी आजी यमुनाबाई धोंडू जाधव. ती आता ७० - ७५ च्या आसपास च्या वयात असेल आणि मी ४ महिन्यानंतर १८ वर्षांची होईन पण हे सगळं सांगण्यापुरतं. मला अजूनही आजीच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपायला आवडतं, तिच्याशी मस्ती करायला कधी-कधी उगाचच तिच्याशी भांडायला.., आम्ही दोघी खूप जवळच्या मैत्रिणी, ती गावी असली अन् मी मुंबई ला तरीही, जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा वर्षभराच्या गप्पा - टप्पा होतात. तिचा माझ्यावर खूप जीव आहे आणि माझा तिच्यावर जरा जास्त ! 


          माझ्या आजीचं माहेर पाट-गोवळ (कोकण) तिकडे मालवणी भाषा बोलली जाते. माझ्या समोर जेव्हा कोण 'माका-तुका' बोलतं तेव्हा डोळ्यासमोर पटकन आजीचा चेहरा येतो. तिच्यासोबतची एक आठवण वेचून सांगणं जरा कठीण च.., इतक्या साऱ्या आठवणी इतकी धमाल आणि बरंच काही..,तरीही विशेष आठवण सांगायची झाली तर.., आमच्या गावच्या घराच्या समोर एक आंब्याचं झाडं आहे. त्याला आम्ही बिटका, चिकयारी आंबा म्हणतो, पावसाळ्यात या झाडावरचे आंबे आमच्या घराच्या अंगणात परसलेले असतात अजून ही, काही पिकून पडलेले तर काही वाऱ्यामुळे कच्चे पडलेले. मी गावाला शाळेत असताना, मी शाळेतून घरी यायच्या आधी, आजी ते पिकेलेले चांगले चांगले आंबे माझ्यासाठी जमवून ठेवी अन् मी शाळेतून घरी आली की सगळ्यात आधी पाटच्या दारावर बसून ते आंबे खाऊन टाकी. सध्या ह्या पावसाळ्यात आंबे भरपूर खायला मिळतात पण आजीने प्रेमाने जमवून ठेवलेल्या त्या बिटक्या आंब्यांची सर कशाला च नाही. ती गावाला राहते, या कोरोनाकाळात ह्या मे महिन्यात गावाला जायला मिळालं नाही तिला भेटता नाही आलं फोन केला की आवर्जून एक च प्रश्न विचारते, "गावाला कधी येणार" खरं तर तिच्या ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीय पण, "येईन लवकर" हेच उत्तर देते. हल्ली तिची उणीव सर्वत्र भासते.
          लहानपणी आई ओरडली की जाऊन तिलाच गच्च मिठी मारायची अन् डोळे सुजे पर्यंत रडायची, मग आजी माझे डोळे तिच्या हाताने, लुगडयाच्या पदराने पुसायची. तिने अश्रू पुसले की त्या अश्रूंना ही मोलाची किंमत मिळते. मग ती आणि मी ओट्यावर बसून असायचो बसल्याजागी मी कधी झोपून जायची कळायचं च नाही. आज ही जेव्हा आई ओरडते ना वाटतं जावं आणि गच्च मिठी मारावी आजी ला...खरं सांगायचं झालं तर, या आधी इतकी ओढ कधी च लागली नव्हती तिची पण आता तिच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपावसं वाटतंय, तिच्या कुशीत निजावसं वाटतंय, तिला मिठी मारून मन भरून रडावसं वाटतंय.. तिचं असणं माझ्यासाठी श्वास घेण्याइतकं गरजेचं वाटतंय...!

                                  - आदिती जाधव.

शुक्रवार, २८ मे, २०२१

वादळ.. अंतरमनातलं

नैसर्गिक वादळ कुठे तरी जाऊन आदळतं आणि काही दिवसांच्या मुहूर्तावर थांबतं सुद्धा पण मनातल्या वादळाला ना आदळ-आपट करता येत ना कुठे थांबावसं वाटत. अनुमान लावायला गेलो तर इथे नक्की वादळाला सुरुवात कुठून झाली आणि का झाली याचं ठोस कारण सापडतं नाही. मग या वादळाचं काय करायचं असंच जाऊ दिलं तर आतल्या आत मनाला पार असून नसल्यासारखं करून टाकेल. आता नक्की काय करायचं..? कुणाला सांगायचं..? आणि मुळात ज्याला सांगू त्याला ते कळेल का...? पण सांगायचं म्हंटल तर मग नक्की काय आणि कसं सांगायचं..? या मनातल्या वादळाला शब्दांत मांडता येईल का..? ते कसं असतं काय असतं हे सांगता येईल का..? 
      काही भांवनाना शब्दांत मांडता येत नाही. हे मनातलं वादळ देखील असंच असतं याला शब्दांत मांडणं कठीण..! जर कुणी शब्दांत मांडलंच तर ते वाचणाऱ्याला किंव्हा ऐकणाऱ्याला समजेलच असं नाही. मग हे वादळ(मनातलं वादळ) नक्की काय असतं..? माझ्या मते तरी भावनांना भरती आल्यावर आपला त्यांच्यावरचा ताबा सुटतो; त्या भावना व्यक्त करायला जमतं नाही त्यावेळेस मनात जे राग, प्रेम,दया, क्षमा अशा अनेक भाव-भावनांचे जबरदस्त वारे वाहत असतात त्यांचं समिश्रकरण होऊन जी उरात आग लागते त्याला वादळ म्हणता येईल. हे वादळ कधी कधी आपल्या आत्मविश्वासाला तडा पाडून, आपल्याला दुःखी करून मनस्ताप देऊन, आपलं नुकसान ही करतं तर कधी कधी स्वतःवर विश्वास ठेवायला भाग पाडून, स्वावलंबी बनवून आपली प्रगती होण्यामागचं कारण ही ठरू शकतं. अर्थात आता ते आपल्यावर आहे अशा मनातील वादळांना कसे सामोरे जायचे त्याला कसे भिडायचे. वस्तुस्थिती बदलणं हे आपल्या हातात नसतं बऱ्याचदा पण; आपल्याला त्रास होणाऱ्या गोष्टींपासून आपण लांब रहायचं की त्यांनाचं आपल्या देखत, आपल्या आयुष्याची माती करू द्यायची हे ज्याचं त्याने ठरवावं नाही का..?

      सध्या कोरोनाच्या काळात टाळेबंदी असल्या कारणाने घरी बसून बसून अनेक विचार डोक्यात येतात  मग आपण आपण तर्क-वितर्क करू लागतो. बऱ्याचदा ह्या सगळ्यामुळे आपण योग्य निर्णय घेतो परंतु, काहिक वेळा ह्या सगळ्यामुळे आपणच अर्थातचे अनर्थ करतो अन् दुखावले तर जातोच सोबत आपल्या जवळच्या माणसांना सुद्धा दुखावतो. निर्णय हा ज्याचा त्याने घ्यावा आणि येणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्याची हिम्मत सुद्धा ठेवावी. त्याचबरोबर ह्या सगळ्यात किती नुकसान होईल आणि कुणाचे होईल याची खबरदारी नक्कीच घ्यावी.

                                   - आदिती जाधव.

गुरुवार, २० मे, २०२१

पहिल्या पावसातली 'ती'

          पहिला पाऊस म्हंटल की, मातीचा सुगंध, झाडांच्या पानांवरचे पावसाचे थेंब, ओले रस्ते, ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट सगळंच कसं डोळ्यासमोर येते ते ही आपोआप. त्या सरींच्या ओसाड पावसात तलप येते ती चहा ची मग तो चहा घेऊन 'ती'च्या जवळ उभं राहून ओसाड सरींचा तर कधी थेंबाथेंबांचा पाऊस अनुभवायचा, त्या क्षणी मनापासून जाणवतं की ह्या पेक्षा दुसरं सुख नाही. 'ती' पावसाच्या थेंबानी भिजलेली, थंडगार वाऱ्याने शहारून गेलेली त्यातल्यात्यात काही थेंब स्वतःजवळ जपून ठेवणारी अन् मला घरबसल्या पाऊस अनुभवून देणारी.. तसं ह्या 'ती' ची कल्पना थोडी निराळी आहे पण अगदी खरी खुरी..!  आता प्रश्न असा की ती म्हणजे नक्की कोण ? तर ही 'ती' म्हणजे खिडकी ! जी मला घरबसल्या पावसाची मजा देते, रात्री चंद्र-चांदण्यांनी भिजवून टाकते आणि दिवसाढवळ्या त्या अवाढाव्य आभाळात सूर्य डोळ्यांसमोर असूनही आपल्यापासून किती लांब आहे याची जाणीव करून देते.


           'ती' म्हणजे ही खिडकी मी राहत होती त्या वसई च्या घरातली, हिच्याविषयी सांगायचं झालं तर.. हिने मला असंख्य स्वप्नं, इच्छा आणि भरभरून प्रेम, आपलेपणा दिलाय. मी इथून चं जग बघितलं होतं, जे अस्पष्ट, अचाट आणि बऱ्यापैकी तुझं-माझं करणार होतं. या खिडकी ने मला अमाप अशा आठवणी दिल्यात ज्यात मी अजून ही वावरते, कधी कधी त्यात पुन्हा जगून घेते. तशी एक आठवण सांगायचं झालं तर कठीणचं आहे, हिने मला चंद्र दाखवलाय अवकाशातला ही आणि.. असो ! आम्ही मे महिन्यात गावावरून वसई ला रहायला आलो अन् पावसाने आमचं जोरदार स्वागत केलं होतं. बिल्डिंग मध्ये राहत असल्याकारणाने पावसात भिजायला जाणं जवळजवळ अशक्य त्याला कारण माझी आई. ताप, सर्दी, खोकला येईल म्हणून ती पावसात भिजायला तेव्हाही देत नव्हती आणि अजून ही देत नाही. तेव्हापासून मी 'ति'च्यासोबत अर्थात त्या खिडकी सोबत पाऊस अनुभवायला सुरुवात केली. पाऊस आणि वारा यांचं एकत्र आगमन झालं की पावसाचे थेंब चेहऱ्यावर यायचे अन् 'ति'ला मला दोघींना पावसाचा सोहळा अनुभवण्यास मिळायचा आणि आम्ही त्याचा भरभरून आनंद लुटायचो.
           माझा वसईतला पहिला पाऊस अजून ही आठवतोय आणि पहिल्या पावसातली 'ती' सुद्धा.., त्यावेळी ती ओली चिंब होती, पावसाच्या थेंबानी छान सजली होती, गार वाऱ्याने किंचित शहारली देखील होती. 'ति'ला पाहून मला तेव्हा इतकं छान वाटलं होतं ना की मला आता शब्दांत मांडताना काय लिहू आणि किती लिहू असं होतंय. इतरांसाठी 'ती' फक्त खिडकी असली तरी माझ्यासाठी 'ती' माझी खूप जवळची मैत्रीण आहे, 'ति'ला माझी सगळी गुपितं ठाऊक आहेत. मी आता ज्या घरात राहते इथे ही खिडकी आहे परंतु त्या खिडकी ची गोष्ट थोडी निराळी आहे अगदी तिच्या अन् माझ्या नात्यासारखी..! आमचं नातं अतुट आणि निर्मळ होतं अजून ही आहे चं, तसं नातं या इकडच्या  खिडकी सोबत होईल की नाही माहीत नाही. ते घर सोडून इकडे आल्यापासून 'ति'च्या सोबत जगलेला, अनुभवलेला एकूण एक क्षण आठवतो, पाऊस तर विसरता येणार च नाही..!  ह्या आठवणी डोळ्यासमोर आल्या की काळजाला चिर पडतो..! कसं असतं ना आपल्या रोजच्या जीवनातल्या काही वस्तू, गोष्टींमध्ये आपला जीव, आपण स्वतः इतके गुंतून जातो ना की त्यांना वगळता आपण, आपलं आयुष्य किती अर्धवट आहे हे लगेच उमजून येतं, म्हणून चं हरवलेल्या गोष्टी सापडल्या की जीव सुखावतो आणि दुरावल्या की तुटतो..!
           - आदिती जाधव.



#bol_ratraniche #खिडकी #आठवणी #पाऊस #चंद्र #आयुष्य #नातं #ती_आणि_मी #मराठी #मराठीकविता #मराठीसाहित्य #मराठीलेख #blog #blogger #quarantinedays #quarantinediaries

शनिवार, १५ मे, २०२१

गावाकडचा मोगरा..


      
         आज बाजारात मोगऱ्याची फुलं बघितली, तसं यात काही विशेष नाही माहितीय मला, पण तरीही आज त्या फुलांकडे पाहून मला फार विशेष वाटलं, ते ही अगदी सहजचं.... हो...! अगदी सहजचं..! ती मोगऱ्याची फुलं, त्यांचा तो मंत्रमुग्ध करणारा सुगंध जवळ येताना खूप साऱ्या आठवणी घेऊन आला आणि नेहमी प्रमाणे त्या आठवणी मला घेऊन गेल्या तिकडे, जिकडे मी माझं बालपण पुन्हा पुन्हा जगते, अगदी मनसोक्त. माझं गावचं घर..! त्या घराच्या पाठीमागे एक शेगलाचं आणि त्याच्याच कडेला आंब्याचं ही झाड आहे, या दोन झाडांना जोडणारी एक मोगऱ्याची वेल..!
     ती मोगऱ्याची वेल श्रावनमासात इतकी बहरून येते की शब्दांत मांडणं कठीण! तिची ती सफेद रंगाची फुलं, त्यांचा तो मनमोहक सुगंध... आ हा हा...! मी आणि माझे अंकल ( काका) रोज सकाळी सकाळी त्या वेलीवरची सगळी फुलं वेचायला जायचो. त्या वेलीवर इतकी फुलं यायची की आमच्या चार घरात मोठं वाडगं (भांडं) भरून फुलांचं वाटप व्हायचं. शाळेत मोगऱ्याच्या फुलांचा गजरा केसात माळून जाताना एक वेगळाचं उत्साह शरीरात संचारायचा. ह्या सगळ्या आठवणी एकदा का डोळ्यासमोर आल्या की डोळ्यात पाऊस दाटून आल्याशिवाय राहत नाही. 
     मी मुंबई ला आल्यापासून माझा पावसाळा इकडेच साजरा होतो. त्या मोगऱ्याच्या वेलीवर फुलं येतात की नाही माहीत नाही. मला खूप आठवण येते त्या मोगऱ्याच्या वेलीची तिला माझी आठवण येते की नाही माहीत नाही. अंकल ( काका) त्या वेलीवरची फुलं वेचायला जात असतील की नाही ते ही माहीत नाही. या सगळ्या प्रश्नांपलिकडे डोक्यात विचार मात्र वेगळाच आला. नाही म्हंटल तरी माणसाची, माणसाशी इतकी जवळीक नसावी कदाचित, जितकी जवळीक त्याची इतर बाबींशी असते. वस्तू-गोष्टी, फुलं-झाडं, पशु-पक्षी हे सगळे सजीव-निर्जीव माणसाला जगायला प्रेरित करतात, कारणाशिवाय हसायला, रडायला शिकवतात. निसर्गाकडे ही काय जादू आहे ना..., या सगळ्यांना माणसासारखं बोलता नाही आलं तरी भावनिकदृष्ट्या आपल्याला त्यांच्यासोबत , त्यांना आपल्यासोबत अगदी घट्ट जोडलं आहे, कधी ही न तुटण्यासाठी...!
                                  - आदिती जाधव.

रविवार, २ मे, २०२१

कोऱ्या कागदावरची ती कविता



              आपल्या प्रत्येकाच्या डायरीत अशी कविता नक्की असते जी आपल्या हृदयाच्या अगदी जवळ असते. तिचं आणि आपलं नातं कोणीही शब्दांत मांडेल इतकं सहज आणि सोपं अजिबातंच नसतं.. यात काही शंकाच नाही की आपण लिहिलेल्या सगळ्याच कविता आपल्या हृदयाशी अगदी चं जवळ असतात... पण ती एक कविता जी आपल्या डायरीच्या त्या कोऱ्या कागदावर लिहिली जाते, ज्या कोऱ्या कागदावर आपण कित्येक वर्षे पेनाचं टोक ही टेकवलेलं नसतं. तो कोरा कागद इतर कागदांसारखा सफेद नसतो, त्या कोऱ्या कागदावर चाफ्याचा रंग उतरलेला असतो, त्याचा गंध पानावर रेंगाळत असतो, बाजूला तो सुकलेला चाफा स्तब्ध असतो. कुणाची तरी आठवण स्वतःच्या पाकळ्यांमध्ये अलगद जपून ठेवून.
          कोऱ्या कागदावरची ती कविता डायरी चाळताना जेव्हा जेव्हा नजरेस पडते, तेव्हा तेव्हा तो चाफा सुगंधासवे मनाला भूतकाळात अलगत घेऊन जातो आणि मग तात्पर्य नसलेली ती गोष्ट पुन्हा काळजाच्या कोपऱ्यात असंख्य भावनांचे ढग गोळा करते. सुख-दुःखाचे ढग एकमेकांमध्ये कोण श्रेष्ठ यावर वाद घालू लागतात मग थोड्या च वेळात प्रेमाच्या सरी अचानक बरसू लागतात. त्या सरींच्या प्रत्येक थेंबात ते क्षण नव्याने फुलून येतात. त्याने दिलेला चाफा हाताच्या ओंजळीत आल्यापासून ते , तो डायरीतल्या पानात सुकून जाईपर्यंतचा सगळा प्रवास आपण क्षणभरात करून येतो. मग नयनातले अश्रू त्या कवितेवर पडू लागतात, ती कविता इंद्रधनुच्या रंगांनी रंगून गेलेली असते, शेवटी स्वतःच येऊन कानी गुणगुणू लागते...

                   ओंजळीतला माझ्या चाफा सुकुनी गेला...,
                    मज अजुनी वाटे तू येशील पुन्हा
                    ओंजळीत तुझ्या चाफा घेऊनी..
                     ओंजळीत तुझ्या चाफा घेऊनी..!

                                                        - आदिती जाधव.

नातं... कागदाचं कवितेशी...



           चार ओळींची कविता जेव्हा कोऱ्या कागदावर लिहिली जाते, तेव्हा त्यात फक्त शब्दांची जुळवा जुळव नसते. एका ओळीतल्या चार-पाच शब्दांत हजारो भाव-भावना लपलेल्या असतात. त्या कुणाला तरी कळतात तर काहींना भावतात, कोण तरी अनुभवतं तर कधी-कधी ती कविता निव्वळ वाचून सोडून देतं. काहींना पटतं काहींना नाही पण त्या कोऱ्या कागदाला मात्र अगदी मनापासून आनंद होत असतो. कवितेच्या चार ओळी कोऱ्या कागदाला नवीन ओळख देतात. त्यावर लिहिताना लेखक-लेखिका, कवी-कवयित्री खाडाखोड करून त्याला त्रास देतात ती गोष्ट वेगळी च म्हणा.
              एखादी कविता लिहिताना, कवी-कवयित्रींच त्या कवितेशी वेगळंच नातं निर्माण होतं. बऱ्याचदा ती कविता त्यांच्या आयुष्यातला एखादा किस्सा सांगत असते. त्या कवितेतला शब्दांशब्द कवियत्री ची भावना उस्फूर्तपणे व्यक्त करत असतो. पण, तुम्ही कधी विचार केलाय का...,  कवितेचं अन् कोऱ्या कागदाचं काय बरं नातं असेल ? आणि कसं असेल ? त्याचं नातं कुणाच्या नजरेस पडलं असेल का, पडलं असेल तर ते कुणाला उमजलं तरी असेल का ? कधी कोणी प्रयत्न तरी केला असेल का, त्यांचं नातं शब्दांत मांडण्याचा..? 
              'काही नाती शब्दांत मांडता येत नाहीत', हे अगदी खरंय..! तुम्ही ही सहमत असाल.... आहात ना सहमत..? हे ही नातं तसंच आहे. जेव्हा कवी-कवयित्रीं, कोऱ्या कागदावर कविता लिहितात तेव्हा तो कोरा कागद त्या कवितेला आपलंसं करून स्वतःमध्ये सामावून घेतो. मग त्या कागदाला त्या कवितेच्या नावाने ओळखलं जातं तर कधी कधी कवितेला त्या कागदावरून लक्षात ठेवली जाते. कागद आणि पेन नेहमी चं मित्र राहिले आहेत. पण कागद आणि कविता यांचं नातं इतकं अतुट आहे की, जरी हातात मोबाईल आला कविता, लेख त्यात type करून ठेवले तरी डायरीतल्या त्या कागदाशी कवितेचं नातं तुटनं अशक्यचं..! 
              - आदिती जाधव.

गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

चहा आणि बरंच काही....





      चहा चा एक जरी घोट घशात गेला ना तरी दिवसाची सुरुवात कशी कडक होऊन जाते. घड्याळावर चालणाऱ्या आयुष्याला दोन सुखाचे क्षण अनुभवण्यास मिळतात. चहाचं आपल्या प्रत्येकाशी एक वेगळंच आणि अतुट नातं असतं. सकाळ-सकाळी चहाचा कप हातात येऊन जो पर्यंत ओठांजवळ जात नाही तो पर्यंत तरी सकाळ झाल्याचं पचनी पडत नाही, एकदा का चहाचा एक घोट प्यायला की शरीरात एक वेगळाच उत्साह संचारतो मग सगळी कामं तडीस नेण्यास आपण सज्ज होतो. आपल्या आजूबाजूला कितीतरी चहाप्रेमी असतात. ज्यांचा दिवस चहाने च सुरू होतो, मध्य ही चहामुळे च अन् शेवट ही चहावरच! मग डॉक्टर किती ही सांगू देत की, 'चहा हा आरोग्यासाठी चांगला नव्हे' पण त्यांचं कुठे कोण ऐकतं आणि जर विषय चहाचा असेल तर एखाद्या चहाप्रेमी साठी तर ते अशक्य च आहे!
        उकळत्या पाण्यात जेव्हा चहापुड टाकली जाते आणि मग त्या उकळत्या पाण्याला रंग येतो, तो रंग पाहून कित्येकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटतं मग त्यात आलं, वेलची, दूध, साखर टाकल्यावर तो मधहोश करणारा चहाचा सुगंध नाकात शिरला की चक्क स्वर्गसुख अनुभवल्यासारखं वाटतं. तशी ह्या चहाची खरी मजा तर कोणासोबत तरी बसून मस्त गप्पा टाकताना येते. त्याच्या प्रत्येक घोटासोबत गप्पा ही रंगत जातात. मग तुम्ही-आम्ही वरून कधी-कधी काही गोष्टी तू-मी वर येतात. उन्हाळा, पावसाळा अथवा हिवाळा असो चहा हा लागतोच! 'ह्या उन्हाळ्यात किती उकडतंय, एक कप चहा देना', असे संवाद आपल्यासाठी नवीन नाहीत. पावसाळा आणि चहा यांचं नातं तर वेगळंच, सोबत जर कांदाभजी आणि चटणी असेल तर और क्या चाहीए..! आणि राहिला तो हिवाळा तर गार वातावरणात चहा पेक्षा जास्त गरम आणि कडक दुसरं कोणतं पेय आवडायचा प्रश्नच येतं नाही.
        चहा हे निव्वळ पेय नाही, कित्येकांचं आयुष्य ह्या चहाशिवाय अपुरं आहे. चहाचा घोट घेता घेता गप्पा रंगतात, संवाद वाढतो, माणूस माणसाला जाणून घेऊ लागतो, मैत्री होते. काही गोष्टी आपल्या आयुष्यात इतक्या महत्वाच्या आणि गरजेच्या बनून जातात की त्यांची जागा इतर कोणी घेऊच शकत नाही..! आणि या गोष्टींमध्ये चहा हा येतोच. अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा चांगला नव्हेच. चहा सुद्धा प्रमाणात असावा अति केल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरणारचं. पण.. चहा हा शेवटी चहाच! तो आला की जगण्या-मरण्याच्या प्रवासात बरंच काही आणतो. मग आयुष्य नावाच्या पुस्तकात चहा आणि बरंच काही असा धडा सोनेरी अक्षरात लिहिला जातो.
             - आदिती जाधव.

सोमवार, २६ एप्रिल, २०२१

माणसांचं असलेलं वस्तू आणि गोष्टींशी नातं..!




            त्याचं जाणं हे नेहमी सारखं चं होतं, अगदी थाटामाटात..! सायंकाळी त्या रित्या आभाळी त्याने रंगांची उधळण करून, पक्षांना परत घरी परतण्याचा संदेश दिला आणि मग तो ही घरी परतू लागला. झाडं सुद्धा हवेच्या झोक्यात डोलून त्याची पाठवणी करत होती. त्या राजबिंड भास्कराची किरणं डांबरी रस्त्यावर पहुडली होती. ते दृश्य अगदी डोळ्यात साठवून ठेवण्यासारखं..! आमचं गाव डोंगरावर, सूर्याचं स्वागत आणि पाठवणी हे दोन्ही सोहळे आम्हांस अगदीच प्रिय..!
    ह्या कोरोना च्या काळात घराबाहेर पडणं अशक्य झालेलं आता ही अशक्य चं आहे म्हणा, पण गेल्या दिवाळीत दोन महिन्यांसाठी आम्ही गावाला जाऊन आलो, तब्बल दोन वर्षांनंतर.., तो आनंद पोटात मावेनासा होता. तिथली ती संध्याकाळ तर काळजाचा ठाव घेणारी होती. ते चित्र न्याहाळता अचानक लक्ष त्या नागमोडी वळणाच्या डांबरी रस्त्यावर गेलं. एकेकाळी इथे पायवाट होती आता डांबरी रस्ता झालाय. तसं तर फक्त त्या वाटेचं रूपांतर रस्त्यात झालंय. सुरुवातीला थोडा परकेपणा जाणवला. लहान असल्यापासून ह्या वाटेवर येणं-जाणं, धावणं-पडणं चालू चं होतं पण त्या दिवशी वाटेवरची ती माती, तो धुरळा सगळंच कसं खूप जवळचं वाटतं होतं. आता त्या वाटेवर धुरळा नाहीय डांबर आहे, हे सत्य स्वीकारणं क्षणभरासाठी अवघड गेलं पण बदल हा निसर्गाचा नियम आहे, हे ही तितकंच खरं आणि जर तो बदल सगळ्यांच्या चांगल्यासाठी झाला असेल तर तो स्वीकारायला हवा. ती वाट मला माझ्या घराच्या अंगणात सोडायची हा डांबरी रस्ता देखील मला माझ्या घरच्या अंगणात च सोडतो पण त्या मातीत, त्या धुरळ्यात जो आपलेपणा होता ना तो या डांबरात मुळीच नाही
    हो..! त्याच त्याच गोष्टींमध्ये अडकून राहिलं तर माणसाचा बौद्धिक, मानसिक विकास थांबू शकतो, यात काही शंका च नाही. पण काही गोष्टींमध्ये बदल झाला तर तो लगेच स्वीकारता तरी कुठे येतो, काही गोष्टींची सवय झालेली असते आणि सवयींना औषध नसतं. तसा प्रयत्न करतेय आवडत्या गोष्टींमध्ये झालेला बदल स्वीकारायचा. माणसांमध्ये बदल होणं साहजिक च आहे आणि त्याची सवय सुद्धा झाली आहे, मलाच काय जवळजवळ सगळ्यांना झाली असावी पण गोष्टी, वस्तू ह्या आयुष्याला रंग देतात, त्यांच्याशी आपलं वेगळंच नातं तयार होतं. उगीच नाही किचन मधलं एखादं भांड हातातून निसटलं आणि तुटलं तर आई रागावते, ओरडते त्याला कारण तिचं असलेलं त्या किचनमधल्या प्रत्येक भांड्याशी नातं. नात्यांमध्ये बदल झाला की बहुदा दुरावा येतो, हे अनुभवाचे बोल बाकी काही नाही. माणसांमध्ये, गोष्टींमध्ये, वस्तूंमध्ये बदल माणसंच घडवतात तरीही त्या वस्तू, गोष्टी माणसाला आहे तसा स्वीकारतात कसली ही तक्रार न करता आणि आपण माणसं मात्र एका झटक्यात सगळी नाती मोडकळीस आणतो पाठचा-पुढचा कसला ही विचार न करता..!
         - आदिती जाधव.

रविवार, २५ एप्रिल, २०२१

जगणं सार्थ तेव्हा ठरेल.....






"आज आग लागलीय यांना, धूर निघतोय थोड्या वेळाने राख ही होईल..! एके काळी हिरवीगार, टवटवीत असावी ही पानं. कित्येक स्वप्नं, इच्छा-आकांक्षा उराशी बाळगून पिवळी झाली असावीत, त्यातली किती स्वप्नं, किती इच्छा पूर्ण झाल्या असतील हे त्यांचं त्यांनाच माहीत..!" हा निव्वळ एक विचार होता माझा, जो या पानांना जळताना पाहून मनातून डोक्यात शिरला आणि पुन्हा गोंधळ करायला सज्ज झाला.
        त्या दिवशी खऱ्या अर्थाने ही पालपाचोळ्याला लागलेली आग डोक्यात आग लावून गेली...! जो येतो तो जातो च.., याला अपवाद नसावा. ही पानं कोवळी होती, सुकून जमिनीवर पडली आता त्यांची राख ही होईल. किती आणि कसं आयुष्य जगलं असेल यांनी, त्यांचा जन्म सार्थ ठरला असेल का? झाडावरून जमिनीवर पडताना, जे आयुष्य जगलं या पानांनी त्याचं समाधान वाटतं असेल का यांना? की जन्माला आल्याचा निव्वळ पश्चाताप असावा? कित्येक प्रश्नांनी कहर केला होता पण उत्तर मात्र त्या पानांनाच माहीत...! माणसांचं ही असंच असावं... नाही का...?? 
        जगणं सार्थ व्हायला हवं. नाही तर निव्वळ यायचं आणि मातीत मिसळायचं याला काय अर्थ आहे राव? बरं जगणं सार्थ व्हावं म्हणजे काय? मला तरी असं वाटतं की जगताना थोडी आयुष्याची मजा घ्या, नेहमी त्याने आपली मजा घ्यायची आणि आपण त्याला मजा घेऊ द्यायची, यात कसलं आलंय औचित्य...? छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख मानून घ्यायलाचं हवं पण कधी तरी भव्य-दिव्य गोष्टींची देखील स्वप्नं पहा फक्त पाहू नका तर ती पूर्ण करायचा प्रयत्न देखील करा , तो प्रवास अनुभवा! दुःखाचं काय ते तर 'मान ना मान मैं तेरा मेहमान' आहे. आयुष्याच्या शर्यतीत कधी तरी हाराल तर कधी जिंकाल, डगमगाल, घाबराल पण खचून जाऊ नका, हिम्मत नका हारु. हारणं-जिंकणं हे सगळं 'क्षणिक समाधान' असतं मान्य आहे, पण तो क्षण तुमच्या आयुष्यात ला महत्वाचा क्षण नक्की च ठरू शकतो, ते क्षणिक समाधान तुम्हाला जगायला प्रेरित नक्कीच करू शकते, जगण्याची मजा ही प्रत्येक क्षणात असते, तुम्ही ती अनुभवून तर पहा...!
        इतरांवर प्रेम करणं तितकंसं कठीण नसावं भोवतेक, कधी तरी स्वतःवर ही प्रेम करा. जगणं हे सार्थ तेव्हा ठरेल जेव्हा तुम्ही स्वतःशी एकरूप व्हाल. तसं तर आपण सगळे च म्हणतो, 'लोक स्वार्थी असतात', हो असतात..., लोक स्वार्थी असतात पण कधी कधी त्या स्वार्थीपणात ही कुणाचा तरी निःस्वार्थ दडलेला असू शकतो, तो ओळखता आला पाहजे कधी कधी आपण इतरांसाठी स्वतःला बंधनं घालतो..., कशाला? तर समोरच्या व्यक्तीला त्रास होऊ नये पण तीच व्यक्ती काही कारणास्तव तुमच्यापासून कायमची लांब गेली तर..., तुम्ही स्वतःला किंव्हा त्या व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून केलेल्या खटाटोपात तुमचे सोनेरी क्षण अनुभवायचे राहून जातात त्याच काय? मान्य आहे आयुष्यात काही ना काही तरी राहून जातं पण जे आपल्या हातात आहे त्याला का राहू द्यावं..? याच छोट्या-मोठ्या गोष्टी जगणं सार्थ ठरवतात, नाही का..?
         - आदिती जाधव.

Featured Post

पत्रास कारण की...

प्रिय तू ,    आज खरंतर इतक्या वर्षात पहिल्यांदा तुला पत्र वगैरे लिहितेय, थोडं दिल खुलास होऊन सांगतेय. तुझी तक्रार असावी माझ्याकडून की, मी का...