गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

चहा आणि बरंच काही....





      चहा चा एक जरी घोट घशात गेला ना तरी दिवसाची सुरुवात कशी कडक होऊन जाते. घड्याळावर चालणाऱ्या आयुष्याला दोन सुखाचे क्षण अनुभवण्यास मिळतात. चहाचं आपल्या प्रत्येकाशी एक वेगळंच आणि अतुट नातं असतं. सकाळ-सकाळी चहाचा कप हातात येऊन जो पर्यंत ओठांजवळ जात नाही तो पर्यंत तरी सकाळ झाल्याचं पचनी पडत नाही, एकदा का चहाचा एक घोट प्यायला की शरीरात एक वेगळाच उत्साह संचारतो मग सगळी कामं तडीस नेण्यास आपण सज्ज होतो. आपल्या आजूबाजूला कितीतरी चहाप्रेमी असतात. ज्यांचा दिवस चहाने च सुरू होतो, मध्य ही चहामुळे च अन् शेवट ही चहावरच! मग डॉक्टर किती ही सांगू देत की, 'चहा हा आरोग्यासाठी चांगला नव्हे' पण त्यांचं कुठे कोण ऐकतं आणि जर विषय चहाचा असेल तर एखाद्या चहाप्रेमी साठी तर ते अशक्य च आहे!
        उकळत्या पाण्यात जेव्हा चहापुड टाकली जाते आणि मग त्या उकळत्या पाण्याला रंग येतो, तो रंग पाहून कित्येकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटतं मग त्यात आलं, वेलची, दूध, साखर टाकल्यावर तो मधहोश करणारा चहाचा सुगंध नाकात शिरला की चक्क स्वर्गसुख अनुभवल्यासारखं वाटतं. तशी ह्या चहाची खरी मजा तर कोणासोबत तरी बसून मस्त गप्पा टाकताना येते. त्याच्या प्रत्येक घोटासोबत गप्पा ही रंगत जातात. मग तुम्ही-आम्ही वरून कधी-कधी काही गोष्टी तू-मी वर येतात. उन्हाळा, पावसाळा अथवा हिवाळा असो चहा हा लागतोच! 'ह्या उन्हाळ्यात किती उकडतंय, एक कप चहा देना', असे संवाद आपल्यासाठी नवीन नाहीत. पावसाळा आणि चहा यांचं नातं तर वेगळंच, सोबत जर कांदाभजी आणि चटणी असेल तर और क्या चाहीए..! आणि राहिला तो हिवाळा तर गार वातावरणात चहा पेक्षा जास्त गरम आणि कडक दुसरं कोणतं पेय आवडायचा प्रश्नच येतं नाही.
        चहा हे निव्वळ पेय नाही, कित्येकांचं आयुष्य ह्या चहाशिवाय अपुरं आहे. चहाचा घोट घेता घेता गप्पा रंगतात, संवाद वाढतो, माणूस माणसाला जाणून घेऊ लागतो, मैत्री होते. काही गोष्टी आपल्या आयुष्यात इतक्या महत्वाच्या आणि गरजेच्या बनून जातात की त्यांची जागा इतर कोणी घेऊच शकत नाही..! आणि या गोष्टींमध्ये चहा हा येतोच. अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा चांगला नव्हेच. चहा सुद्धा प्रमाणात असावा अति केल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरणारचं. पण.. चहा हा शेवटी चहाच! तो आला की जगण्या-मरण्याच्या प्रवासात बरंच काही आणतो. मग आयुष्य नावाच्या पुस्तकात चहा आणि बरंच काही असा धडा सोनेरी अक्षरात लिहिला जातो.
             - आदिती जाधव.

सोमवार, २६ एप्रिल, २०२१

माणसांचं असलेलं वस्तू आणि गोष्टींशी नातं..!




            त्याचं जाणं हे नेहमी सारखं चं होतं, अगदी थाटामाटात..! सायंकाळी त्या रित्या आभाळी त्याने रंगांची उधळण करून, पक्षांना परत घरी परतण्याचा संदेश दिला आणि मग तो ही घरी परतू लागला. झाडं सुद्धा हवेच्या झोक्यात डोलून त्याची पाठवणी करत होती. त्या राजबिंड भास्कराची किरणं डांबरी रस्त्यावर पहुडली होती. ते दृश्य अगदी डोळ्यात साठवून ठेवण्यासारखं..! आमचं गाव डोंगरावर, सूर्याचं स्वागत आणि पाठवणी हे दोन्ही सोहळे आम्हांस अगदीच प्रिय..!
    ह्या कोरोना च्या काळात घराबाहेर पडणं अशक्य झालेलं आता ही अशक्य चं आहे म्हणा, पण गेल्या दिवाळीत दोन महिन्यांसाठी आम्ही गावाला जाऊन आलो, तब्बल दोन वर्षांनंतर.., तो आनंद पोटात मावेनासा होता. तिथली ती संध्याकाळ तर काळजाचा ठाव घेणारी होती. ते चित्र न्याहाळता अचानक लक्ष त्या नागमोडी वळणाच्या डांबरी रस्त्यावर गेलं. एकेकाळी इथे पायवाट होती आता डांबरी रस्ता झालाय. तसं तर फक्त त्या वाटेचं रूपांतर रस्त्यात झालंय. सुरुवातीला थोडा परकेपणा जाणवला. लहान असल्यापासून ह्या वाटेवर येणं-जाणं, धावणं-पडणं चालू चं होतं पण त्या दिवशी वाटेवरची ती माती, तो धुरळा सगळंच कसं खूप जवळचं वाटतं होतं. आता त्या वाटेवर धुरळा नाहीय डांबर आहे, हे सत्य स्वीकारणं क्षणभरासाठी अवघड गेलं पण बदल हा निसर्गाचा नियम आहे, हे ही तितकंच खरं आणि जर तो बदल सगळ्यांच्या चांगल्यासाठी झाला असेल तर तो स्वीकारायला हवा. ती वाट मला माझ्या घराच्या अंगणात सोडायची हा डांबरी रस्ता देखील मला माझ्या घरच्या अंगणात च सोडतो पण त्या मातीत, त्या धुरळ्यात जो आपलेपणा होता ना तो या डांबरात मुळीच नाही
    हो..! त्याच त्याच गोष्टींमध्ये अडकून राहिलं तर माणसाचा बौद्धिक, मानसिक विकास थांबू शकतो, यात काही शंका च नाही. पण काही गोष्टींमध्ये बदल झाला तर तो लगेच स्वीकारता तरी कुठे येतो, काही गोष्टींची सवय झालेली असते आणि सवयींना औषध नसतं. तसा प्रयत्न करतेय आवडत्या गोष्टींमध्ये झालेला बदल स्वीकारायचा. माणसांमध्ये बदल होणं साहजिक च आहे आणि त्याची सवय सुद्धा झाली आहे, मलाच काय जवळजवळ सगळ्यांना झाली असावी पण गोष्टी, वस्तू ह्या आयुष्याला रंग देतात, त्यांच्याशी आपलं वेगळंच नातं तयार होतं. उगीच नाही किचन मधलं एखादं भांड हातातून निसटलं आणि तुटलं तर आई रागावते, ओरडते त्याला कारण तिचं असलेलं त्या किचनमधल्या प्रत्येक भांड्याशी नातं. नात्यांमध्ये बदल झाला की बहुदा दुरावा येतो, हे अनुभवाचे बोल बाकी काही नाही. माणसांमध्ये, गोष्टींमध्ये, वस्तूंमध्ये बदल माणसंच घडवतात तरीही त्या वस्तू, गोष्टी माणसाला आहे तसा स्वीकारतात कसली ही तक्रार न करता आणि आपण माणसं मात्र एका झटक्यात सगळी नाती मोडकळीस आणतो पाठचा-पुढचा कसला ही विचार न करता..!
         - आदिती जाधव.

रविवार, २५ एप्रिल, २०२१

जगणं सार्थ तेव्हा ठरेल.....






"आज आग लागलीय यांना, धूर निघतोय थोड्या वेळाने राख ही होईल..! एके काळी हिरवीगार, टवटवीत असावी ही पानं. कित्येक स्वप्नं, इच्छा-आकांक्षा उराशी बाळगून पिवळी झाली असावीत, त्यातली किती स्वप्नं, किती इच्छा पूर्ण झाल्या असतील हे त्यांचं त्यांनाच माहीत..!" हा निव्वळ एक विचार होता माझा, जो या पानांना जळताना पाहून मनातून डोक्यात शिरला आणि पुन्हा गोंधळ करायला सज्ज झाला.
        त्या दिवशी खऱ्या अर्थाने ही पालपाचोळ्याला लागलेली आग डोक्यात आग लावून गेली...! जो येतो तो जातो च.., याला अपवाद नसावा. ही पानं कोवळी होती, सुकून जमिनीवर पडली आता त्यांची राख ही होईल. किती आणि कसं आयुष्य जगलं असेल यांनी, त्यांचा जन्म सार्थ ठरला असेल का? झाडावरून जमिनीवर पडताना, जे आयुष्य जगलं या पानांनी त्याचं समाधान वाटतं असेल का यांना? की जन्माला आल्याचा निव्वळ पश्चाताप असावा? कित्येक प्रश्नांनी कहर केला होता पण उत्तर मात्र त्या पानांनाच माहीत...! माणसांचं ही असंच असावं... नाही का...?? 
        जगणं सार्थ व्हायला हवं. नाही तर निव्वळ यायचं आणि मातीत मिसळायचं याला काय अर्थ आहे राव? बरं जगणं सार्थ व्हावं म्हणजे काय? मला तरी असं वाटतं की जगताना थोडी आयुष्याची मजा घ्या, नेहमी त्याने आपली मजा घ्यायची आणि आपण त्याला मजा घेऊ द्यायची, यात कसलं आलंय औचित्य...? छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख मानून घ्यायलाचं हवं पण कधी तरी भव्य-दिव्य गोष्टींची देखील स्वप्नं पहा फक्त पाहू नका तर ती पूर्ण करायचा प्रयत्न देखील करा , तो प्रवास अनुभवा! दुःखाचं काय ते तर 'मान ना मान मैं तेरा मेहमान' आहे. आयुष्याच्या शर्यतीत कधी तरी हाराल तर कधी जिंकाल, डगमगाल, घाबराल पण खचून जाऊ नका, हिम्मत नका हारु. हारणं-जिंकणं हे सगळं 'क्षणिक समाधान' असतं मान्य आहे, पण तो क्षण तुमच्या आयुष्यात ला महत्वाचा क्षण नक्की च ठरू शकतो, ते क्षणिक समाधान तुम्हाला जगायला प्रेरित नक्कीच करू शकते, जगण्याची मजा ही प्रत्येक क्षणात असते, तुम्ही ती अनुभवून तर पहा...!
        इतरांवर प्रेम करणं तितकंसं कठीण नसावं भोवतेक, कधी तरी स्वतःवर ही प्रेम करा. जगणं हे सार्थ तेव्हा ठरेल जेव्हा तुम्ही स्वतःशी एकरूप व्हाल. तसं तर आपण सगळे च म्हणतो, 'लोक स्वार्थी असतात', हो असतात..., लोक स्वार्थी असतात पण कधी कधी त्या स्वार्थीपणात ही कुणाचा तरी निःस्वार्थ दडलेला असू शकतो, तो ओळखता आला पाहजे कधी कधी आपण इतरांसाठी स्वतःला बंधनं घालतो..., कशाला? तर समोरच्या व्यक्तीला त्रास होऊ नये पण तीच व्यक्ती काही कारणास्तव तुमच्यापासून कायमची लांब गेली तर..., तुम्ही स्वतःला किंव्हा त्या व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून केलेल्या खटाटोपात तुमचे सोनेरी क्षण अनुभवायचे राहून जातात त्याच काय? मान्य आहे आयुष्यात काही ना काही तरी राहून जातं पण जे आपल्या हातात आहे त्याला का राहू द्यावं..? याच छोट्या-मोठ्या गोष्टी जगणं सार्थ ठरवतात, नाही का..?
         - आदिती जाधव.

Featured Post

पत्रास कारण की...

प्रिय तू ,    आज खरंतर इतक्या वर्षात पहिल्यांदा तुला पत्र वगैरे लिहितेय, थोडं दिल खुलास होऊन सांगतेय. तुझी तक्रार असावी माझ्याकडून की, मी का...