बुधवार, १६ जून, २०२१

ती स्वतःलाच परकी झाली, अगदी कायमचीच !

रात्र झाली होती. तो अर्धा चंद्र किती छान दिसत होता. स्वरा रात्रभर त्या चंद्राकडे पाहत, चांदण्यांमध्ये रमून गेली होती. तिला रात्र फार आवडायची. चंद्र, तारे, चांदण्या सगळे च तिच्या खूप जवळचे ! घराच्या अंगणातली रातराणी तर तिचा जीव की प्राण ! पण, एके रात्री सगळं तिला परकं झालं, काहीच आवडेना झालं. स्वरा, ६ वर्षांची नाजूक पोर, जी सगळ्यांमध्ये रमायची पण हरवून जायची ती फक्त स्वतःच्या जगात. स्वतःशी सवांद साधायला, स्वतःमध्ये हरवून जायला तिला खूप आवडे. पण, त्या रात्री ती नेमकी स्वतःला परकी भासली, त्या रात्री चंद्र, तारे, चांदण्या, अंगणातली रातराणी सगळं च तिला परकं वाटलं.
         रात्रीचे अकरा वाजले होते. घराचा दरवाजा कोणी तरी ठोकवल्याचा आवाज आला. तिने आधीच अंदाज लावला होता की, तिचे बाबाच बाहेर दरवाजा ठोकवीत असतील. तिच्या आईने दरवाजा उघडला. स्वराचे बाबा घरात आले. हातपाय धुवून जेवायला बसले, जेवून झालं. स्वरा तशीच तिच्या खोलीत गेली आणि हातात कोणता तरी कागद घेऊन बाहेर हॉल मध्ये येत होती इतक्यात; तिला तिच्या आई चा आवाज ऐकू आला, ती क्षण भर स्तब्ध उभी राहिली. दुसऱ्याच क्षणाला तिला तिच्या बाबांचा ही आवाज ऐकू आला, ती तशीच हॉल च्या दिशेने गेली. तिने पाहिलं तर तिचे आईबाबा एकमेकांशी मोठ्या आवाजात बोलत होते, खर तर ते दोघे भांडत होते. तिला कारण समजलं नाही पण; तिच्या बाबांनी तिच्या आईवर हात उचलेला पाहून, तिच्या डोळ्यात ढग दाटून आले परंतु ते ढग बरसायला तयार नव्हते. तिला रडायचं होतं पण डोळ्यातून पाणी च निघत नव्हतं. तिला तिच्या बाबांना सांगायचं होतं, 'नका मारू असं माझ्या आईला', परंतु तिची हिम्मत होतं नव्हती. तिला तिच्या आईला ही सांगावंसं वाटतं होतं, 'नको अशी छोट्या-छोट्या गोष्टींवरून बाबांशी भांडत जाऊस' पण, तिला ते सांगायला जमत नव्हतं. ती ओल्या डोळ्यांनी तिच्या खोलीत जाते आणि तिच्या हातातला कागद पाहत असते, ज्यावर तिने आईबाबा आणि स्वरा तिघांच चित्र काढलेलं असतं. ते पाहता पाहता ती झोपी जाते.
         ह्या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी नवीन नव्हत्या. तिचे आई-बाबा गेले २-३ महिने नेहमी भांडायचे पण आज वर तिच्या बाबांनी तिच्या आईवर कधी हात उचलला नव्हता. ६ वर्षांची पोरं ती, तिला जे घडतंय ते दिसत होतं पण समजतं नव्हतं. तिचे आईबाबा का नेहमी भांडतात या प्रश्नाचं उत्तर ती शोधू पाहत होती; ते उत्तर तिला मिळत नव्हतं. तिला ह्या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत होता. हे सगळं ती त्या चंद्राला सांगू पाहत होती सगळं काही, अन् नेमकी त्या रात्री अमावस्या होती. तो चंद्र काही तिला भेटला नाही. तिने ती रात्र चंद्राची वाट पाहत ओल्या डोळ्यांनी काढली, तो चंद्र मात्र आलाच नाही. त्या दिवशी तिला खूप एकटं वाटलं. घडत असलेल्या प्रकारामध्ये ती काहीच करू शकत नव्हती. ना ती चंद्राला शोधू शकत होती ना तिच्या आईबाबांना भांडण्यापासून थांबवू शकत होती. तिला स्वतःचाच खूप राग आला होता. ह्या सगळ्यांमुळे ती सगळ्याच गोष्टींपासून अगदी स्वतःपासून ही दुरावत चालली होती. जे घडतंय ते मुकाट्याने पाहत होती आणि रात्री खिडकी जवळ बसून रडत होती. स्वराला होणाऱ्या त्रासाबद्दल तिच्या आईबाबांना कल्पना देखील नव्हती. ते दोघे त्यांच्यामध्ये असलेल्या वादामुळे स्वराचा विचार देखील करत नव्हते, आणि याचच तिला खूप दुःख होतं

         एके दिवशी तिने ठरवलं जाऊन आईबाबांना सरळ विचारायचं, 'तुम्ही का भांडता सारखे सारखे?' नेहमी प्रमाणे तिचे बाबा रात्री अकरा वाजता घरी आले आणि परत तिच्या आईबाबांचं भांडण सुरू झालं. स्वराला राहवेना, तिने शेवटी ओरडून तिच्या आईबाबांना विचारलं, 'तुम्ही का नेहमी भांडता?', हे ऐकून तिच्या आईने रागात तिच्या गालावर खूप जोरात मारलं आणि म्हणाली , 'तुझ्यामुळे होतंय हे सगळं, नसती जन्मला आलीस तर बरं झालं असतं.' हे ऐकून स्वराच्या बाबांचा राग अनावर गेला  आणि त्यांनी परत तिच्या आईवर हात उचलला. स्वरा मात्र स्तब्ध उभी होती, तिच्या कानात आईच वाक्य घुमत होतं. तिला काहीच कळलं नाही. ती अजूनही तिथे स्तब्ध उभी होती, पण हे कुणाच्या लक्षात आलं नाही. तिचे आईबाबा भांडणात इतके गुंतले होते की, स्वरा ते पाहून तिच्या खोलीत गेली, आणि हे त्यांना कळलं देखील नाही. ती रात्रभर विचार करत होती. तिच्या डोक्यात एकच प्रश्न होता आणि तो म्हणजे, 'खरंच ! हे सगळं माझ्यामुळे होतंय का ?'
         तिची आई रागात सहज बोलून गेली पण, स्वराच्या मात्र ते क्षणभरातच मनात खोलवर रुतून गेलं. आज ह्या गोष्टीला दोन दिवस होतील. ह्या दोन दिवसात स्वतःमध्ये हरवणारी स्वरा, स्वतःचा तिरस्कार करू लागली. आईबाबांच्या भांडणाला स्वतःला दोषी ठरवत होती, तिला स्वतःचा खूप राग येऊ लागला. तिला चंद्र, तारे, चांदण्या इतकं च काय तर जीव की प्राण असणारी तिची रातराणी देखील नकोशी वाटू लागली. रागारागात स्वराला सहज बोलून गेलेली तिची आई दुसऱ्याच दिवशी विसरून सुद्धा गेली; पण त्या एका वाक्यामुळे स्वरा मात्र स्वतःला परकी झाली ती कायमचीच !

                 - आदिती जाधव.



#bol_ratraniche #swara #मराठी #मराठीकविता #मराठीसाहित्य #मराठीलेख #मराठीकथा #लघुकथा #रात्र #चंद्र #तारे #चांदण्या #रातराणी #आईबाबा #राग #चित्र #परकेपणा 

गुरुवार, १० जून, २०२१

असाच एक पावसाळा, शेतकऱ्याच्या घरातला...

        जून महिना...! पावसाळा सुरू झाला होता. तसे सगळेच पावसाची वाट पाहत होते. शेतकरी तर डोळे ढगांकडे लावून बसले होते. वातावरण ढगाळ होत चाललं होतं. सगळ्यांना वाटलं आता पाऊस येणार म्हणून गावकरी ज्यांची-त्यांची कामे संपवून घरी परतू लागले होते. वेळ संध्याकाळची होती. राघव त्याच्या घराच्या अंगणात येऊन, आई-बाबांची वाट पाहू लागला. तिकडे शेतात राघव ची आई, राघवच्या बाबांना सांगू लागली, 'रवांदेत ता काम आता, चला आटपा लवकर, माझो लेक रघु ( राघव ला घरी प्रेमाने रघु नावाने बोलावीत) वाट बघत असत, तुमची आय पण तिकडं मागल्या दारावर बसून असत.' तेवढ्यात रघुचे (राघव) चे बाबा शेतातून बाहेर आले आणि रघुच्या आई ला म्हणाले, 'पोटापाण्यासाठी करूक लागता गो, जरासो एळ झालो तर त्याका काय व्हता, माझो लेक अन् माझी आय घेतं ली समजून माका.' असे म्हणून ते दोघे ही घराच्या दिशेने वाटचाल करू लागले. तिकडे घरी रघुची आजी रघु ला, 'आय न बाप येवू ची एळ झाली पाण्याखाली इस्तेव घाल' अशी पाटच्या दारावरून सांगू लागली. 
         संध्याकाळी सहा च्या सुमारास रघु चे आई-बाबा घरी आले. 'इलसं काय र पोरा..?' असं विचारून आजी ने रघुच्या बाबांचं स्वागत केलं. 'इलयं, इलयं' असं म्हणून रघुचे बाबा उत्तरले. रघुचे बाबा हात-पाय धुवून बाहेर येताचं रघु त्यांच्या पाठी घरभर फिरून दिवसभरात काय काय घडले ते सांगू लागला. त्याने, त्याच्या मित्राला, त्याच्या भावाच्या सायकल बद्दल बोलताना ऐकलं होतं आणि हे तो त्याच्या बाबांना सांगणार इतक्यात ढगांच्या गडगडण्याचा आवाज कानी ऐकू आला.., क्षणभरासाठी तो थांबला, सगळेच शांत झाले. आता पाऊस येणार, वीज जाणार, घरात अंधार होणार म्हणून रघुची आई रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागली. पाऊस आला तर गाई-बैलांचा चारा भिजेल अन् मग ते उपाशी राहतील म्हणून राघूचे बाबा चाऱ्यावर ताडपत्री घालायला गेले. रघूचं बोलणं कोणी ऐकत च नव्हतं म्हणून त्याला राग आला न तो जाऊन ओट्यावर बसला. क्षणार्धात पावसाने हजेरी लावली, सरीवर सरी बरसू लागल्या. अचानक रघुच्या डोक्यावर पाण्याचे थेंब पडू लागले, त्याने वर पाहिलं तर घरावरच्या छपरातून पाण्याचे थेंब गळत होते. तो उठला आणि आईला सांगायला गेला तर तिकडे ही छपराला भोकं पडून त्यातून पाणी गळतं होतं.
             रात्रीच्या जेवणाची तयारी करता करता रघूची आई जिथं-जिथं छप्पर गळत होतं तिथं-तिथं घरातली भांडी आणून ठेवत होती. रघु मात्र उभा राहून सगळं पाहत होता. तेवढ्यात घरच्या पाठीमागे रघुचे बाबा रघुला बोलावतं आहेत हे रघुला कळताच तो तसाच धावत घराच्या पाठीमागे गेला. त्याने पाहिलं, त्याचे बाबा गोठ्यात उभे होते, तिथे ही जागोजागी पाणी गळंत होतं. रघुचे बाबा रघुला घरातून भांडी आणायला सांगत होते, तो घरात आला आणि भांडी शोधू लागला पण सगळी भांडी घरात छप्पर गळत होतं तिथं लावली होती. त्याने जाऊन हे त्याच्या बाबांना सांगितलं. गाई-गुरं भिजू नयेत म्हणून त्याच्या बाबांनी हाताला मिळतील त्या पिशव्या, कागद सगळं भर पावसात गोठ्याच्या वर जाऊन जिथं-जिथं पाणी गळतं होतं तिथं-तिथं लावल्या. ते कागद, पिशव्या वाऱ्याने उडून जाऊ नयेत यासाठी त्यावर दोन-दोन दगड ठेवले. रघु हे सगळं लांबून च पाहत होता. त्याची आई पावसापासून स्वतःचं घर वाचवत होती, सांभाळत होती, सावरत होती. अन् त्याचे बाबा ज्यांच्यामुळे त्याचं घर चालतं त्यांचं घर पावसापासून वाचवत होते. कसा-बसा पाऊस थांबला आणि रघुच्या घरी रात्री च जेवण झालं. झोपायची तयारी सुरू झाली पण; रघुची आई मात्र परत पाऊस येईल आणि छप्पर गळेल या चिंतेत जागीच राहिली. शेवटी पाऊस आला अन् छप्पर गळू लागले. रघुची आई परत सगळी भांडी आणून जागजागी ठेऊ लागली, रघुचे बाबा ही झोपेतून उठून रघुच्या आई ला मदत करू लागले. 
             हे पाहून त्याला लगेच च सकाळी त्याचा मित्र, त्याच्या भावाच्या सायकल बद्दल बोलत होता ते आठवलं, ते बाबांना ऐकून घ्यायला पावसामुळे वेळ मिळाला नाही आणि त्यामुळे त्याला आलेला राग, हे सगळं त्याच्या डोळ्या समोर आलं. त्याला रहावलं नाही, डोळयातून अश्रू वाहू लागले त्यामुळे त्याला घराच्या छप्परातून टपकणाऱ्या पावसाचे थेंब त्याला दिसेनासे झाले. आज संध्याकाळी जेव्हा रघुचे आई-बाबा घरी आले तेव्हा रघुला त्यांना सांगायचं होतं की, 'रघुच्या मित्राचा मोठा भाऊ त्याची जुनी सायकल विकणार आहे अन् ती सायकल रघु ला हवी आहे,' पण; घरची परिस्थिती पाहता स्वतःची अनाठायी निर्माण झालेली इच्छा आणि आईबाबांचे कष्ट यामध्ये त्याला महत्वाचं कोण हे कळून आलं. रघुने त्याची इच्छा मनातच ठेवली अन् ओल्या डोळ्यांनी झोपी गेला. 
             

     
                                            - आदिती जाधव.


#पावसाळा #शेतकरी #घर #छप्पर #इच्छा #सायकल #मराठी #मराठीसाहित्य #लघुकथा #महाराष्ट्र #मालवण #आई #बाबा #आजी #अंगण #रात्र  #अश्रू  #पावसाचेथेंब

शुक्रवार, ४ जून, २०२१

चार ओळींची चारोळी...

चार ओळींची चारोळी बरंच काही सांगे...,



                  पावसाच्या सरी आणि तुझ्या आठवणी...




           तुुझी चाहूल आणि माझ्या बेभान भावना....



                     तुुझ्या आठवणीं नी केेलेला घात

बुधवार, २ जून, २०२१

मेरे ग़मों की रात का तू उजला सवेरा..

         खूप महिन्यांपूर्वी 'राहत फतेह अली खान' यांनी गायलेलं 'ये जो हल्का हल्का सुरूर है' गाणं ऐकलं होतं, त्या गाण्यातील 'मेरे ग़मों की रात का तू उजला सवेरा' ही ओळ काळजाला चर्रर्र करून गेली ! अन् सहज च आजी चा चेहरा डोळ्यासमोर आला. 
          आपल्यापैकी कोणीही किती ही मोठं झालं तरी बालपण विसरणं आज वर तरी शक्य झालेलं नाही, या नंतर शक्य होईल असं वाटतं ही नाही. आपल्या सगळ्यांनाच बालपणीच्या आठवणींमध्ये रमायला खूप आवडत असेल यात शंका नसावी. त्या वयातील ती निरागसता, तो अल्लडपणा कमालीचा असतो. ते निष्पाप मन अन् अतरंगी तन ! सगळंच कसं छान छान. मला आठवणींमध्ये रमायला खूप आवडतं तिथे पुन्हा पुन्हा जगायला ही! लहान मूल आईबाबांच्या सहवासात जास्त रमतं यात वाद नाही पण माझ्यासाठी माझी आजी जास्त जवळची आहे अजूनही! माझी आजी यमुनाबाई धोंडू जाधव. ती आता ७० - ७५ च्या आसपास च्या वयात असेल आणि मी ४ महिन्यानंतर १८ वर्षांची होईन पण हे सगळं सांगण्यापुरतं. मला अजूनही आजीच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपायला आवडतं, तिच्याशी मस्ती करायला कधी-कधी उगाचच तिच्याशी भांडायला.., आम्ही दोघी खूप जवळच्या मैत्रिणी, ती गावी असली अन् मी मुंबई ला तरीही, जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा वर्षभराच्या गप्पा - टप्पा होतात. तिचा माझ्यावर खूप जीव आहे आणि माझा तिच्यावर जरा जास्त ! 


          माझ्या आजीचं माहेर पाट-गोवळ (कोकण) तिकडे मालवणी भाषा बोलली जाते. माझ्या समोर जेव्हा कोण 'माका-तुका' बोलतं तेव्हा डोळ्यासमोर पटकन आजीचा चेहरा येतो. तिच्यासोबतची एक आठवण वेचून सांगणं जरा कठीण च.., इतक्या साऱ्या आठवणी इतकी धमाल आणि बरंच काही..,तरीही विशेष आठवण सांगायची झाली तर.., आमच्या गावच्या घराच्या समोर एक आंब्याचं झाडं आहे. त्याला आम्ही बिटका, चिकयारी आंबा म्हणतो, पावसाळ्यात या झाडावरचे आंबे आमच्या घराच्या अंगणात परसलेले असतात अजून ही, काही पिकून पडलेले तर काही वाऱ्यामुळे कच्चे पडलेले. मी गावाला शाळेत असताना, मी शाळेतून घरी यायच्या आधी, आजी ते पिकेलेले चांगले चांगले आंबे माझ्यासाठी जमवून ठेवी अन् मी शाळेतून घरी आली की सगळ्यात आधी पाटच्या दारावर बसून ते आंबे खाऊन टाकी. सध्या ह्या पावसाळ्यात आंबे भरपूर खायला मिळतात पण आजीने प्रेमाने जमवून ठेवलेल्या त्या बिटक्या आंब्यांची सर कशाला च नाही. ती गावाला राहते, या कोरोनाकाळात ह्या मे महिन्यात गावाला जायला मिळालं नाही तिला भेटता नाही आलं फोन केला की आवर्जून एक च प्रश्न विचारते, "गावाला कधी येणार" खरं तर तिच्या ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीय पण, "येईन लवकर" हेच उत्तर देते. हल्ली तिची उणीव सर्वत्र भासते.
          लहानपणी आई ओरडली की जाऊन तिलाच गच्च मिठी मारायची अन् डोळे सुजे पर्यंत रडायची, मग आजी माझे डोळे तिच्या हाताने, लुगडयाच्या पदराने पुसायची. तिने अश्रू पुसले की त्या अश्रूंना ही मोलाची किंमत मिळते. मग ती आणि मी ओट्यावर बसून असायचो बसल्याजागी मी कधी झोपून जायची कळायचं च नाही. आज ही जेव्हा आई ओरडते ना वाटतं जावं आणि गच्च मिठी मारावी आजी ला...खरं सांगायचं झालं तर, या आधी इतकी ओढ कधी च लागली नव्हती तिची पण आता तिच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपावसं वाटतंय, तिच्या कुशीत निजावसं वाटतंय, तिला मिठी मारून मन भरून रडावसं वाटतंय.. तिचं असणं माझ्यासाठी श्वास घेण्याइतकं गरजेचं वाटतंय...!

                                  - आदिती जाधव.

Featured Post

पत्रास कारण की...

प्रिय तू ,    आज खरंतर इतक्या वर्षात पहिल्यांदा तुला पत्र वगैरे लिहितेय, थोडं दिल खुलास होऊन सांगतेय. तुझी तक्रार असावी माझ्याकडून की, मी का...