मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१

तुझे माझे असे काही तरी राहुनी जावे...

तू दिसावे मजला अन् उगा भास व्हावे
येता जवळी तू अंग माझे शहारून जावे
त्या चांद राती पार न्हाहूनि जावे
तुझे माझे असे काही तरी राहुनी जावे

तुझ्या डोळ्यांना स्पर्श माझ्या पापण्यांचा व्हावा
चालता चालता उगा तुझा हात माझ्या हातात यावा
माझे स्पंदन क्षणात चं इतके तेज व्हावे 
अन् तुझे माझे असे काही तरी राहुनी जावे

अनेक आठवणींचे किस्से 
मांडता येईना शब्दांत त्यांना इतके भाव 
तुझ्या डोळ्यांनी माझ्या डोळ्यात ते पाहुनि घ्यावे
अन् तुझे माझे असे काही तरी राहुनी जावे

का बरं असे नेहमीचं घडावे 
तू येता समोर मी माझे भान हरपुनी जावे
तुझ्या सोबतीत मी थोडे जगून घेताना
तुझे माझे असे काही तरी राहुनी जावे

असे किती काळ चालावे
'कधी तरी तू आणि मी ''आपण'' व्हावे'
या एका इच्छेने मी तुझ्याकडे पाहावे अन्
 तुझे माझे असे काही तरी राहुनी जावे

                        - ©आदिती जाधव.



गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१

पाटीवरचा खडू।

        आज मोबाईल मध्ये इंस्टा स्क्रोल करता करता अचानक एक किस्सा आठवला. हो ! गावालाच घडलेला.., माझा लहान भाऊ 'स्वरूप' म्हणजे च माझ्या अंकलचा मुलगा. तसा हुशार आहे पण, अभ्यास म्हंटल की, त्याला भूक लागते, झोप येते, कान दुखतो आणि बरंच काही... ओट्यावर रेंगनारा स्वरूप मला गिअरवाली सायकल चालवायला शिकवत होता. बघता बघता मोठा झाला. आमच्या घरी ' बाबू ' या नावाची पिढी जात परंपरा पुढे सरकवत 'स्वरूप' ला सुद्धा 'बाबू' टोपणनाव पडलं. संध्याकाळची वेळ होती, घड्याळाचे काटे पुढे पुढे सरकत होते. मी आणि बारकापोर ( साक्षी ) ओट्यावरच बसलो होतो. तेवढ्यात बाबू ची एन्ट्री झाली. अभ्यासाचं दप्तर घेऊन त्यातली पाटी आणि खडू काढून आमच्या समोरच अभ्यासाला बसला. अंक लिहायचे ठरलं. पाटीवर रेषा मारायला पट्टी सापडत नव्हती, शेवटी काय तर पुस्तकाच्या आधारानेच रेषा मारल्या. मी सहजच त्याच्या दप्तरात हात घातला आणि मला माझ्या लहानपणीचा सगळ्यात आवडता खाऊ सापडला, 'पाटीवरचा खडू'.
        पाटीवरचा खडू ..., जवळजवळ सहा - सात वर्षांनंतर, त्याला बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं. मोह आवरेनासा झाला मग काय टाकला मी तोंडात. इतक्या वर्षांनंतर आजही त्याची चव काही बदलली नव्हती अगदी मातीसारखी चविष्ट. मी कधी मातीची चव घेतली नाही पण; मानवी देह..., वासावरून चवीचा अंदाज घेता येतो की. त्या क्षणाला  मी स्वर्गसुख अनुभवल्यासारखं वाटलं. दुर्दैवाने हे बाबू ने बघितलं, ' ए तू काय खाल्लसं..? खरं खरं सांग खडू खाल्लास ना..? नको खाऊस, टाकून दे आधी, तो चांगला नसतो" असं मला म्हणाला. मी त्याच्याकडे पाहत च बसली त्याच बोलून होण्याआधी मी खडू खाऊन जवळपास संपवला होता. तेवढयात काकी आल्या आणि बाबू ने, काकी ला, मी खडू खाल्ल्याचं सांगितलं. मग काय, काकी ही बोलल्या मला " खरोखर खाल्लास तू..?, खडू काय चांगला असतो..? असं कायपण खात नको जाऊस." मी फक्त मान डोलावली. क्षणभरासाठी मला कळलंच नाही की, 'मी अजून ही लहान आहे की, बाबू मोठा झालाय..?'
         खडू खाणं चांगलं नसतं माहिती आहे मला पण, त्या खडू शी अनेक आठवणी जोडल्या आहेत शिवाय, त्याची चव मला इतकी आवडते की त्यापुढे कसलाच विचार करावासा वाटत नाही. मी हट्टी आहे, थोडीशी रागीट आणि बालिशपणा माझ्या अंगात ठोसून भरलाय त्यामुळे, अंगणवाडी ते इयत्ता चौथी या वर्गांत असताना अनेकदा मित्र - मैत्रिणींशी वाद - विवाद झालेत. गट्टी करायला तर हवी मग ती कशी..? त्यावर छान तोडगा काढला होता आम्ही, 'ज्याला गट्टी करायची असेल, तो एक अख्खा खडू देईल'. आमच्यातले वाद नेहमी या पाटीवरच्या खडू ने च मिटवलेत. मग घरी आल्यावर अभ्यासाला बसताना मम्मी विचारायची, " रोज दोन खडू घेऊन जातेस, करतेस काय इतकं त्याचं..?" आता तिला कसं सांगणार, एक खडू तर गट्टी जमवण्यात हातातून जायचा आणि दुसरा अर्धा पोटात; अर्धा पाटीवर लिहिता लिहिता हरवुन यायचा. मग मी तिला काही ठराविक पण; अगदी खरी खुरी कारणं द्यायची, ती म्हणजे... "आज खूप अभ्यास होता, शुद्धलेखन लिहिलं, गणितं सोडवली, आणि किती चित्र काढली मग खडू संपला, मधल्या सुट्टीत खडू कुठे हरवला काही माहीत च नाही, मी शोधलं पूर्ण वर्गात पण नाही मिळाला,माझ्या मैत्रिणीने आणला नव्हता खडू मग तिला दिला, ती मानसी माहितीये ना तिचा खडू हरवला, मग माझ्याकडच्या खडू मी तिला दिला." माझी ही अशी कारणं ऐकून ती सुद्धा मला तितक्याच जोमाने पुन्हा पश्न विचारायची, मग मी निरुत्तर होऊन शेवटी माघार घ्यायची.
          हा खडू किती तरी वेळा निमित्त ठरलाय, शाळेचे दिवस पुन्हा पुन्हा अनुभवण्याचं. अशी खूप लहान मुलं असतील ज्यांनी कधी खडू खायचा विचार ही केला नसेल; त्या उलट आम्ही खडू हातात आला की, तो थोडासा तरी तोंडात टाकल्याशिवाय करमत नाही. काळ्या रंगाची पाटी, चविष्ट खडू, नवीन पुस्तकांचा वास, वहीच्या उजव्या बाजूच पान ह्या सगळ्या गोष्टी तेव्हापासून प्रिय होत्या त्या अगदी आतापर्यंत. कमाल वाटायची ह्या सगळ्या गोष्टींची ! असं कोणी नसावं बहुतेक.., ज्यांना ह्या गोष्टीं जवळच्या आणि आवडीच्या नाहीत. खरं तर ह्या सगळ्यांमुळे शाळेतले दिवस इतके सुंदर आणि आठवणीत राहण्यासारखे गेले. ज्या दिवसापासून शाळेत जायला लागली, त्या दिवसापासून ह्या सगळ्या गोष्टींशी पक्की मैत्री झाली. अजून ही ती मैत्री तितकीच पक्की आहे इतकी की, कधी ही न तुटणारी..!
          - ©आदिती जाधव.




#मराठी #मराठीलेख #पाटीवरचा_खडू #शाळेचे_दिवस #आठवणी  

शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१

कुमारीकेची सौभाग्यवती होताना...

आज आडिवलेकरांच्या घरी पाहुण्यांची गर्दी जमली होती. घरभर खमंग वास सुटला होता. घरासमोर मोठा मंडप उभारला होता. सगळीकडे आनंदाचा बहर आला होता; का नाही येणार म्हणा.., दोन दिवसांनी आडिवलेकरांच्या लाडक्या लेकीचा म्हणजेच रेवती चा लग्नसोहळा पार पडणार होता. तसं काही कारणास्तव रेवती च लग्न खूप घाई गडबडीत ठरलं पण; मुलाकडची मंडळी ही आडिवलेकरांच्या, मित्राच्या नात्यातले होते, त्यामुळे आडिवलेकर साहेबांना जास्त काळजी वाटत नव्हती, शिवाय त्यांनी सगळी शहानिशा करून चं लग्नाला होकार दिला होता. सगळीकडे लगीनघाई सुरू होती. पण! रेवती मात्र काळजीत दिसत होती. "रेवती, रेवती.., अगं कुठे आहेस ? " रेवती ची काकी तिला शोधत तिच्या खोलीत आली. पाहते तर काय सगळीकडे पसारा होता आणि रेवती मात्र एका कोपऱ्यात शांत बसली होती. 
      'रेवती' ही आडिवलेकर घराण्यातली एकुलती कन्या ! तिला एक सख्खा मोठा भाऊ आणि दोन चुलत भाऊ होते, त्यामुळे घरात सगळ्यांचाच तिच्यावर खूप च जीव . रेवती ही सगळ्यांना मायेने जपत होती, तिचा, तिच्या काकी - काका वर खूप जीव होता. तिची तिच्या काकी सोबत पक्की आणि अतूट मैत्री झाली होती. रेवतीची काकी तिच्या खोलीत आली, रेवती ला काकी ने दोन - तीन वेळा हाक मारली पण तीच लक्ष च नव्हतं. काकी ने रेवतीच्या डोक्यावरून मायेने हाथ फिरवला आणि " काय झालं " असं विचारलं, काकी चा स्पर्श होताच रेवती भानावर आली आणि, "काही नाही काकी.., सहजच विचार करत होती." असं बोलू लागली, हे ऐकताच काकी हसू लागल्या आणि रेवतीच्या बाजूला बसल्या. रेवती काकी च्या मांडीवर डोकं ठेऊन रडू लागली. काकीं नी तिला धीर दिला अन् विचारू लागल्या की, " काही मनाविरुद्ध होतंय का तुझ्या..? नाही करायचं आहे का तुला हे लग्न..?" तेवढ्यात रेवती उठून बसली, त्यांच्या कडे पाहून डोळे पुसत म्हणाली.., "नाही काकी.., असं काहीच नाही! सगळं छान होतंय फक्त सगळं इतक्या लवकर झालं की, मला हे सगळं स्वीकारायला जरा अवघड पडतं आहे. या घराला, इथल्या माणसांना, पाठीमागच्या बागेला, आपल्या शेतीला, या गावाला सोडून जायचं.. ते ही अश्या ठिकाणी जिथे मी अनोळखी असेन ! ह्या सगळ्या विचारांनी मनात गोंधळ घातलाय. माझ्या माणसांना सोडून जावसं वाटत नाहीये. " हे सगळं काकी शांत बसून ऐकत होत्या, रेवती च बोलून झाल्यावर काकी तिला म्हणाल्या, "तुला खरंच वाटतंय का तू हे सगळं सोडून जात आहेस ? जरा नीट विचार करून सांग हा.., तू आपली माणसं सोडून जाणार आहेस की, दोन कुटुंबाना एकत्र जोडनार आहेस ? " रेवती विचारात पडली. काकी तिला स्वतःच उदाहरण देऊन समजावू लागल्या, " लग्न म्हणजे स्वतःच घर सोडून अनोळखी घरी जाणं नव्हे तर दोन कुटुंबाना एकत्र जोडण्याचा सोहळा असतो. मी जेव्हा ह्या घरात येणार होती, तेव्हा मी ही अनोळखी च होती तुमच्यासाठी आणि तुम्ही सगळे माझ्यासाठी पण, मी या घराला, इथल्या माणसांना आपलंसं केलं. ह्या घराने, इकडच्या माणसांनी मला आपलंसं केलं. आता तू ही पाहते आहेस की, हे घर इथली माणसं आणि मी एकमेकांशिवाय अपुरे आहोत." काकी च म्हणणं रेवतीला पटलं आणि चेहऱ्यावर हास्य आणत तीने काकी ला मिठी मारली. 
      लग्नाचा दिवस उजाडला. अगदी आदल्यादिवसा पासून सगळेच जोरदार तयारी करत होते. लग्नसोहळ्याला सुरुवात झाली. रेवती मांडवात आली. लग्नाच्या विधीं ना सुरुवात झाली. मंगळसूत्र गळ्यात घालता वेळी ती स्वतःशीच पुटपुटली " कुमारीकेची सौभाग्यवती होतेय, दोन घरांना एकत्र जोडतेय". 
लग्न अगदी सुखरूप पार पडलं. विधी पूर्ण झाल्या, फोटोशूट ही झाला, आता वेळ आली होती पाठवणी करण्याची. आडिवलेकर मंडळी सुखाचे अश्रू गाळत होती. रेवती चा पाय अंगणाबाहेर पडत नव्हता. तिने पाठी वळून पाहिले आणि बालपणापासून आता पर्यंतच प्रवास अगदी क्षणभरात केला. अंगणात मांडलेला भातुकली चा खेळ आज तिला नव्याने खेळावासा वाटत होता. लंगडी, खो- खो, लगोरी, लपंडाव, पकडापकडी हे सगळे खेळ खेळलेल्या अंगणात तिला तिचं बालपण सुस्पष्ट दिसत होतं. सगळ्यांनी तिला कुशीत घेऊन नवीन आयुष्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या. जाता जाता रेवतीने पुन्हा एकदा तिच्या काकी ला मिठी मारली. आणि रेवती सासरी निघाली...!

                     - ©आदिती जाधव.

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

ओंजळीतला चाफा

ओंजळीतला माझ्या, चाफा सुकुनी गेला..
मज अजुनी वाटे तू येशील पुन्हा
ओंजळीत तुझिया चाफा घेउनी..
ओंजळीत तुझिया चाफा घेउनी..!

सांज ढळुनी गेली
चाफा अजूनही दरवळतोय..
चांदणे शिंपित रात उशाशी
उद्याचे स्वप्न दाखवतेय..

स्वप्नपूर्ती च्या वाटेवर कोणी उभे भासते 
नजर हळूच त्याच्या ओंजळीत जाते
पाहूनी त्याच्या ओंजळीतला चाफा
मज  हलकीच जाग येते..

कळुनी चुकते सारे मजला
सत्य हे काही वेगळेच आहे
सुकलेला चाफा पाहुनी
नजर उंबऱ्यापाशी जात आहे

मज अजुनी वाटे तू येशील पुन्हा
ओंजळीत तुझिया चाफा घेउनी..

               - आदिती जाधव.


#चाफा #ओंजळ #चांदणं #मराठी #मराठीसाहित्य #कविता 

गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

ही वाट दूर जाते..

आज खूप दिवसांनी सगळे विडिओ कॉल वर भेटलो. इंटरनेट च्या अडचणींमुळे किती वेळा तो विडिओ कॉल अडकत होता, किती वेळा कट करून परत करावा लागत होता पण; सगळे एकत्र येत आहेत म्हंटल की, ह्या उत्साहापुढे त्या इंटरनेटच्या अडचणी काही च नाहीत. खूप साऱ्या गप्पा - टप्पा रंगल्या मग चिडवा - चिडवी, उगाच च खेचा खेची असे अनेक किस्से घडले. रात्र होतेय आणि सगळ्या आठवणी डोळ्यासमोर झिम्मा खेळत आहेत. हसोळ ! माझं गाव खरं तर फक्त गाव कसलं जग आहे ते माझं. तिथे असलेलं माझं कौलारू घर, त्या घरात राहणारी माझी माणसं. सारंच कसं माझं - माझं ! हळू हळू सगळ्या आठवणी डोळ्यासमोर रंगीबेरंगी चित्र रेखाटत होत्या. ते घर, ती वाडी, तो रस्ता....!
       रस्ता..., ह्या रस्त्यासाठी अनेक खटाटोप केलेत. गाव राहीलं डोंगराच्या पायथ्याशी आणि आमची वाडी डोंगराच्या माथ्यावर, त्यामुळे कुठे जायचं असेल तर घाटी पायी उतरून जावं लागायचं, आता रस्ता झालंय आधी तिकडे फक्त पायवाट होती..., जंगलातून जाणारी ! अनेक झाडाझुडपांच्या, फुलांच्या, फळांच्या अर्थात निसर्गाच्या सानिध्यात किती तरी वेळा प्रवास केलाय याच वाटेवरून..., आता ही ती वाट तशीच आहे फक्त थोडी रुंद झाली आणि रस्त्यात रूपांतर झालं, तिकडे एक आंब्याचं झाडं आहे. जिकडे आमची चावडी रंगायची अजून ही रंगते, दगड फेकून फेकून झाडावरचे कैरी,आंबे तोडायचो आणि मग वाड्यात जाऊन प्रत्येक जण स्वतःच्या घरातून तिखट, मीठ, तेल, सूरी आणि वाटी असं एक एक साहित्य आणायचा. वाटीत ( plate ) कैरीचे बारीक फोड करायचो, त्यात तिखट, मीठ आणि तेल घालून मिक्स करून खायचो. मग घरच्यांकडून जो ओरडा पडायचा की आम्ही सगळे परत रस्त्यावर पळायचो. पण आम्ही बनवलेली मसाला कैरी डिश खाऊन इतकं भारी आणि समाधानी वाटायचं की, घरचे ओरडले तरी त्याच दुःख नसायचं. खूप धमाल उडवली आहे ह्याच वाटेवर, सुट्टीतून गावाला गेल्यावर ह्याच वाटेवरून गाव सोडून  मुंबई ला आलो, मुंबई आहे मायानगरी पण जितकं प्रेम त्या वाटेवरच्या मातीने त्या धुळीने दिलं तितकं प्रेम मुंबई च्या डांबरी रस्त्यावर कुठे..?
       ह्याच वाटेवरून सुरू केलेला प्रवास आज इथं पर्यंत आलाय..., म्हणे ही वाट खूप दूर जाते...., आता पाठीमागे वळून पाहिलं की ह्याच वाटेशी असंख्य वेळा केलेलं भांडण आठवतं, कारण काय तर.., याच वाटेवर कित्येक वेळा पडून - धडपडून ढोपर - कोपर फोडून घेतले होते. चुकी त्या वाटेची कधी च नव्हती. आम्ही च वेंधळे होतो पण याचा दोष मात्र कायम ह्या वाटेला मिळाला. कधी कधी वाटतं ही वाट सांगत असावी आम्हाला की, ' बघा, काल पडलात - धडपडलात , ढोपर - कोपर फोडून घेतले म्हणून आज इतक्या सक्षमपणे उभे आहात'. परत पुढे वळून पाहिलं की धुकं धुकं दिसत. जसं जसं पुढे जाल तसं तसं एक नवीन गुपित तुमची वाट पाहत असेल खूप साऱ्या जबाबदाऱ्या, अनेक स्वप्नं, इच्छा - आकांक्षा आणि तितकीच हिम्मत, नवनवीन सुवर्णसंधी, माणसं आणि बरंच काही असं सगळ्यांच गाठोडं घेऊन. मग वाटतं की, होय अगदी खरं! ही वाट दूर जाते..... 

            - आदिती जाधव.

#मराठी #मराठीसाहित्य #लेख #वाट #गाव #चावडी #आठवणी

Featured Post

पत्रास कारण की...

प्रिय तू ,    आज खरंतर इतक्या वर्षात पहिल्यांदा तुला पत्र वगैरे लिहितेय, थोडं दिल खुलास होऊन सांगतेय. तुझी तक्रार असावी माझ्याकडून की, मी का...