शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१

छत्रीतली मेनका । ( भाग २ )

      बेल वाजली, दुसरा तास सुरू झाला. दोघे ही वर्गात गेले. दोघे ही गप्प, असेच पुढचे तास ही निघून गेले आणि मधली सुट्टी झाली. कुणाल, निनाद ला मैदानात घेऊन गेला. मग निनाद च म्हणाला, " काय झालंय माहीत नाही रे, पण ती जात च नाहीये डोक्यातून", कुणाल जास्त काही न बोलता त्याला फक्त इतकाच म्हणाला की, "अरे इतकं काही नाही, होतं असं कधी कधी जास्त विचार नको करुस. तू हुशार आहेस, ह्या सगळ्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष नको करुस.., हो ! माहिती आहे मला तू नाही करणार असं पण, मी सकाळ पासून पाहतोय तुला, तुझं लक्ष च नव्हतं वर्गात आणि राहिला प्रश्न 'ती' चा तर, आपण आज जाऊन पाहू ती माळावर दिसते का.., जर दिसली तर बघू, नाही दिसली तर त्याचा ही जास्त विचार नको करुस. चल, भूक लागली आहे मला. डब्यात आई ने तुझ्या आवडीची चण्याची भाजी दिली आहे मस्त चमचमीत ! चल खाऊ." असं म्हणून दोघे ही वर्गात गेले. तास संपले, महाविद्यालय सुटलं. ठरल्याप्रमाणे दोघे ही देवळाच्या माळावर गेले, "मला असं वाटतंय की, आपण नको यायला पाहिजे होतं इकडे, चल जाऊ परत," निनाद जरासा अस्वस्थ होऊन सांगू लागला. कुणाल ने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, " थांबू थोडा वेळ, पाहू येतेय का ती." खरं तर इतक्या वर्षात निनाद ला एका मुली साठी इतकं अस्वस्थ झालेलं कुणाल ने कधी पाहिलं च नव्हतं. 
      संध्याकाळ होतं आली होती. आभाळ रंग बदलू लागलं होतं, पण 'ती' छत्रीतली मेनका काही दिसेनाच. शेवटी मग नाही नाही म्हणता निनाद ने हट्ट च धरला घरी परत जायचा, कुणालकडे दुसरा पर्याय सुद्धा नव्हता. दोघे ही घरी जायला निघाले, जाता जाता न राहून कुणाल ने निनाद ला विचारलंच की, "तुझ्या डोक्यात नक्की काय सुरू आहे. ह्या वयात एखादी मुलगी आवडणं साहजिक आहे, इतका कसला विचार करतोयस..?" निनाद थांबला आणि म्हणू लागला, " हे सगळं साहजिक आहे मला ही समजतंय पण; ज्या मुलीचा चेहरा ही पहिला नाही मी, त्या मुलीचा इतका विचार का करतोय मी, ह्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये रे ! आणि..., खरं तर तिचा विचार करण्यापासून मी स्वतःला थांबवू पाहतो पण नाही रे, जमत च नाही आहे, ती जातचं नाहीये डोक्यातून. पहिल्यांदाच होतंय असं, कळत नाहीये मला काय करू." निनादचा हा गोंधळ सोडवणं कुणाल ला काही जमत नव्हतं, दोघे ही शांत उभे होते. "चल जाऊ घरी, अभ्यास करायचा आहे." असं म्हणून निनाद घराच्या दिशेने चालू लागला, कुणाल ही त्याच्या सोबत च घरी गेला. रात्र गेली, सकाळ झाली. तास कमी असल्याकारणाने महाविद्यालय आज लवकर सुटलं. आज संध्याकाळी सगळ्यांनी चहाच्या टपरी वर भेटायचं ठरवलं. सगळे जमले पण निनाद काही दिसत नव्हता. मग कुणालने त्याला कॉल केला, त्यावेळी निनाद झाडाखाली उभा होता.
 निनाद ने कॉल उचलला, "हो, येतोय मी अर्ध्या रस्त्यात आलोय" असं म्हणून टपरीवर जाऊ लागला. समोरून त्याला सावनी ताई येताना दिसली, " काय रे.., आज एकटाच..? कुणाल आणि बाकी सगळे कधी चे थांबलेत तिकडे " असं विचारू लागली. " आज जरा उशीर झाला गं ताई, हे काय चाललोय आता " असं म्हणून तो पुढे जाऊ लागला. 
      'सावनी' ही कुणाल ची मोठी बहीण. निनाद देखील तिला कुणाल सारखा च होता. निनाद थांबला आणि पाठीमागे पाहून " ताई ऐक ना " असं सावनी ना म्हणाला. सावनी ने " बोल ना काय झालं ? " असं विचारलं. निनादला काय बोलावं सुचत नव्हतं मग तिने च विचारलं, "सगळं ठीक आहे ना ?." 'हो' अश्या अर्थाने मान डोलावून निनाद तिला सांगू लागला, " हो म्हणजे तसं सगळं च ठीक आहे पण, हल्ली थोडं विचित्र वाटतंय. अभ्यासात लक्ष लागत नाहीये, कळत नाहीये काय करू." सावनी त्याच्याकडे पाहून हसू लागली आणि म्हणाली, " कुणाल ने सांगितलं मला, तू अस्वस्थ झाला आहेस ते पण, कारण काही सांगितलं नाही." निनाद हसू लागला आणि म्हणाला, " इकडेच दोन दिवसांपूर्वी कोण तरी दिसली होती मला, छत्रीमुळे मला तिचा चेहरा दिसला नाही, पण तरीही तिचा विषय काही डोक्यातून जात नाही आहे माझ्या. तुला सांगू का.., खरं तर मुद्दा असा आहे की, हे सगळं असं का होतंय ह्याच उत्तर मिळत नाहीये मला त्याचा जास्त त्रास होतोय आणि मला स्वतःला थांबवता ही येत नाहीये तिचा विचार करण्यापासून." सावनी ने सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाली, " निनाद रिलॅक्स ! ज्या वयात तुम्ही आता आहात, त्या वयात असं होणं खूपच साहजिक आहे, इतका त्रास नको करून घेऊस, ह्या पुढे ही अश्या खूप मुली दिसतील तुला, त्यांचे चेहरे ही दिसतील म्हणून तू प्रत्येकी साठी इतका अस्वस्थ होणार आहेस का..? आणि तिच्याविषयी सांगायचं झालं तर, तिने तुझं लक्ष का वेधून घेतलं तुझं तुला ठाऊक, तिच्या विषयी तुला काय वाटतं हे ही तुझं तुला च ठाऊक पण लक्षात घे अजून खूप लहान आहात तुम्ही, आता कुठे तुम्हाला जगण्याची खरी मजा कळेल. हळू हळू तरुण वयात प्रवेश कराल असे अनेक अनुभव येतील तुम्हाला, प्रत्येक गोष्टीसाठी डोक्याला इतका ताप नको देउस. आता तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे ते बघ, त्याचा विचार कर, अजून खूप काही बाकी आहे, ये तो शुरुवात है..! बाकी आता काय करायचं, कुणाला महत्व द्यायचं आणि किती द्यायचं ते तुझं तू ठरव. जिंदगी में अभी बहुत आगे जाना है।" हे सगळं ऐकून निनाद चा गोंधळ जरासा दूर झाल्याचं दिसलं. " थँक्स ताई," असं म्हणून दोघे ही आपापल्या रस्त्याने निघाले.
      निनाद टपरीवर पोहचला. मित्रांच्या गप्पा झाल्या, सगळे घरी सुद्धा परतले, निनाद आणि कुणाल त्यांच्या अंगणातल्या, आंब्याच्या चौथऱ्यावर बसून गप्पा मारत होते. निनाद ला परत पूर्वीसारखं मोकळं आणि तणावमुक्त पाहून कुणाल ला छान वाटलं. " काय रे.., भेटली वाटतं तुला, तुझी 'छत्रीतली मेनका' नाही..! म्हणजे सकाळ पर्यंत जो ताण होता तुझ्या चेहऱ्यावर तो आता ओसरल्यासारखं वाटतंय म्हणून विचारलं." असं विचारत कुणाल ने निनाद ची थट्टा केली. त्याला प्रतिउत्तर देताना निनाद म्हणाला, " 'ती' नाही भेटली पण सावनी ताई भेटली, तिच्याशी बोललो तर आता जरा मोकळं वाटतंय." कुणाल ने विचारलं, "का ? असं काय बोलली ताई..?" निनाद उत्तरला, "जास्त काही नाही रे ! ह्या सगळ्याकडे पहायचा दृष्टीकोन बदलला माझा. आज दुपार पर्यंत 'ती कोण आहे' याचं उत्तर शोधत होतो, दुपार नंतर 'मी कोण आहे' याचं उत्तर शोधावसं वाटतंय, इतकंच !" एवढं बोलून दोघेही घरी गेले. त्या संध्याकाळ पासून निनाद चा प्रवास सुरु झाला.. ' मी कोण ' हे शोधण्याचा..
               
                     - ©आदिती जाधव.

शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१

छत्रीतली मेनका । ( भाग १ )

सायंकाळची वेळ होती, निनाद एका झाडाखाली उभा होता. तेवढ्यात त्याला कुणाल चा कॉल आला. बरोबर दोन दिवसांआधी निनाद त्या झाडाजवळून सायकल घेऊन ठरलेल्या ठिकाणी त्याच्या मित्रांना भेटायला जात होता.., ओझरता पाऊस पडतं होता.., सायकल चालवता चालवता त्याच लक्ष रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या एका मुलीकडे गेलं. तिचा चेहरा छत्री मुळे झाकला गेला होता पण निनाद मात्र सारखा तिला पाठी वळून वळून पाहत होता. जशी सायकल पुढे जाऊ लागली तशी ती नजरे आड झाली. निनाद त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी म्हणजेच रस्त्याच्या कडेला असलेली चहाची टपरी तिकडे जाऊन पोहचतो. सगळे मित्र मंडळी गप्पा टप्पा मारतात, एक - एक कप चहा घेऊन सायकल वरून मस्ती करत करत आपापल्या घरी जातात. 
      निनाद, तोरस्करांचा एकुलता एक मुलगा. त्याचे बाबा तालुक्यातल्या महाविद्यालयात प्राध्यापक आणि आई ग्रंथपाल, त्यामुळे निनाद ला अभ्यासाची, पुस्तकांची फार आवड. तसा जरा हट्टी पण समजूदार; मनाने निर्मळ पण थोडासा रागीट स्वभावाचा. रात्र झाली होती, घराच्या पाठी असलेल्या रातराणी चा सुगंध सगळीकडे पसरला होता. निनाद ओट्यावर गणितं सोडवत बसला होता, तेवढ्यात त्याला पटकन ती छत्री घेऊन उभी असलेली मुलगी आठवली..., कोण असेल ती ? त्याला प्रश्न पडला. क्षणभरात च "काय चाललंय माझं, गणितं सोडवायची बाजूला ठेवून तिचा विचार करत बसलोय'', असं म्हणून त्याने तेवढ्या पुरतं तिला टाळलं आणि गणितं सोडवायला सुरुवात केली. थोड्याच वेळात त्याच्या आई ने त्याला हाक मारली, ' निनाद.., जेवायला ये'. जेवता जेवता तोरस्करांच्या घरी नेहमी प्रमाणे गप्पा-गोष्टी झाल्या. शतपावली करायला निनाद बाहेर अंगणात गेला आणि कुणाल ला हाक मारली, कुणाल ने, ' आलो रे..' असा सूर लावत प्रतिउत्तर दिलं. कुणाल आणि निनाद शेजारी च राहत. कुणाल हा निनाद चा बालपणी चा अगदी जवळचा आणि खास मित्र. कुणाल येताच दोघांच्या गप्पा सुरु झाल्या आणि त्या गप्पांच्या मध्ये निनाद बोलता बोलता बोलून गेला, ' आज मी कट्टयावर येत होतो ना तेव्हा देवळाच्या माळावर एक मुलगी दिसली रे मला, हलका पाऊस पडत होता त्यात ही छत्री घेऊन उभी होती, त्यामुळे चेहरा काय दिसला नाही.' कुणाल हसत हसत निनाद ची थट्टा उडवू लागला आणि म्हणाला, '' गेल्या महिन्यात १७ वर्ष पूर्ण झाली आपल्याला, आता पर्यंत, 'तुला कोणत्या मुली चा चेहरा पाहायला नाही मिळाला', अशी तक्रार करताना कधी ऐकलं च नव्हतं. सगळं ठीक आहे ना भावा.'' असं म्हणून कुणाल हसू लागला. यावर काही च न म्हणता निनाद देखील हसू लागला. 
      सकाळ झाली, दुसरा दिवस उजाडला. सगळी पोरं महाविद्यालयात जाण्यासाठी बस स्थानकाजवळ उभी होती. बस आली, कुणाल आणि निनाद एकत्र च बसले होते, कुणाल ने अचानक त्या मुली चा विषय काढला तर निनाद, '' जाऊदेत असेल कोणी तरी,'' असं म्हणून दुर्लक्ष केलं. महाविद्यालयाच्या बस स्थानकाआधीच बस स्थानक आलं आणि गर्दी ओसरली; तेवढ्यात एक मुलगी बस मध्ये चढली. निनाद च अचानक लक्ष गेलं, त्याने तिला क्षणभर डोळ्यात टिपलं आणि स्वतःला च विचारू लागला..,' ही तीच आहे का, जी मला काल रस्त्याच्या पलीकडे दिसली होती..' निनादला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळे पर्यंत तिने त्याच्याकडे पाहिलं ! आणि मग काय तर, पहिल्यांदा दोघांची नजरेला नजर  भिडली..., तेवढ्यात गतिरोधकाने मध्ये च नाक खुपसलं आणि दोघे ही भानावर आले. निनादच्या डोक्यात राहून राहून एक च विचार घोळ घालत होता.., रस्त्याच्या पलीकडे पाहिलेली 'ती' आणि बस मधली 'ती' एकच की वेगवेगळ्या...?? बस थांबली महाविद्यालयाच बस स्थानक आलं, सगळी पोरं महाविद्यालयात गेली. वर्गात सगळे गप्पा टाकत बसले होते, निनाद मात्र एकटा बसून कसल्याशा विचारात मग्न होता. त्याच्या मित्रांनी त्याला विचारलं ही पण तो काही सांगेना. प्राध्यापक आले सगळी पोरं आपापल्या जागे वर जाऊन बसली. शिकवणी सुरू असताना कुणाल ने हळू च निनाद ला विचारलं, '' तू अजून ही तिचा च विचार करतो आहेस का..?'' निनाद ने काहीही न बोलता फक्त नाही अश्या अर्थाने मान डोलावली. पुढचा काही वेळ दोघांमध्ये शांततेत गेला. पहिला तास संपला आणि निनाद कुणाल ला तसाच बाहेर घेऊन आला. ''आज बस मध्ये एक मुलगी आलेली, आपल्या कॉलेज च्या आधी च्या बस स्थानक तिकडे ती बस मध्ये चढली; मी पाहिलं तिच्याकडे मला ती, त्या रस्त्यापलीकडच्या छत्रीतल्या मुली सारखी वाटली पण मी तिचा चेहरा पहिला च नव्हता.., मला नक्की माहीत नाही ती तीच आहे की अजून कोणी..'' निनाद ने कुणाल ला एका श्वासात सगळं कोडं सांगितलं. कुणाल त्याच्या कडे पाहतच राहिला.

*क्रमशः

                 - ©आदिती जाधव.

बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

भाग्यवंत आम्ही रुपारेल चे !

        आज माझ्या डिग्री कॉलेज चा पहिला दिवस होता. साहजिक च, आवडत्या कॉलेजमध्ये, आवडते विषय म्हंटल्यावर पहिला दिवस छान च जाणार आणि गेला सुद्धा. काल च ओरिएंटेशन झालं. डिग्री कॉलेजमध्ये पुढील तीन वर्ष काय अभ्यासक्रम असेल, परीक्षा कश्याप्रकारे होतील आणि कोणते कोणते उपक्रम असतात, ते कश्याप्रकारे पार पडतात. अश्या सगळ्याच गोष्टींबद्दल थोडी थोडी माहिती दिली. एकंदरीत डिग्री कॉलेज ची थोडक्यात ओळख करून दिली. अर्थात सध्याच्या परिस्थितीत सगळं च ऑनलाईन सुरू आहे, त्यात आमचं कॉलेज ही आलंच ते ही ऑनलाईन च ! मुंबई मधलं डी. जी. रुपारेल कॉलेज ( D. G. RUPAREL COLLEGE OF THE ARTS, SCIENCE AND COMMERCE ) मी माझं ज्युनिअर कॉलेज इथे च पूर्ण केलं. आता डिग्री कॉलेज सुद्धा इथेच. म्हणा इतकी भव्य आणि सुंदर वास्तू कोणाला सोडून जाविशी वाटेल. डी. जी. रुपारेल कॉलेज, मी ज्युनिअर कॉलेजच्या ऍडमिशनसाठी पहिल्यांदा या वास्तूत पाऊल टाकलं होतं. त्यावेळेस मला समजलंच नाही मी कुठून आत आली आणि कुठून बाहेर पडली. खरं तर तेव्हा मी फ्रंट गेट ( माटुंगा रोड स्टेशनच्या बाहेर चा गेट ) मधून आत आली आणि बॅक गेट ( दादर जवळचा गेट ) मधून बाहेर पडली पण; हे मला कॉलेज सुरू झाल्यानंतर माहीत पडलं. 
           कॉलेज सुरू झालं, मग हळू हळू कॉलेज ची ओळख झाली, नवनवीन मित्र-मैत्रिणींशी ओळख झाली. कॉलेजमधले कट्टे, रुपांगण सगळंच ओळखीचं आणि जवळच झालं. कॅन्टीन, कॅम्पस, आर्टस् बिल्डिंग, सायन्स बिल्डिंग, सगळंच खूप खूप भारी वाटलं होतं आता ही वाटतं. आमचं कॉलेज सुरू झालं आणि ८ महिन्यांनी लॉक डाउन पडलं पण, या आठ महिन्यांत कॉलेज चा इतका लळा लागला की, पुन्हा कधी रुपारेल मध्ये जातोय असं वाटत होतं. तसं कॉलेजच्या कामासाठी १ - २ वेळा जाणं झालं होतं पण तात्पुरतं च ! लगेच जाऊन लगेच घरी आलो. जेव्हा कॉलेज नियमितपणे सुरू होतं, तेव्हा आल्यावर आधी १२ आर्टस् मध्ये जाऊन डबा खायचा मग लेक्चर ला बसायचो, त्यांनतर मधल्या सुट्टीत कॅम्पसमध्ये फिरायचो, कॅन्टीनमध्ये जाऊन तिकडचे पदार्थ खायचो, खूप फोटोस् काढायचो आणि मग कॉलेज सुटलं की ट्रेन साठी धावत पळत सुटायचो. लेकचर्स ऑफ असले की कॅम्पसमध्ये बसून मित्र-मैत्रिणींशी गप्पा टाकायच्या. कधी कधी स्टडी रूम मध्ये जाऊन अभ्यास करायचा, तसं तिथे अभ्यास कमी पण गप्पा जास्त रंगायच्या. रुपारेल मधलं वातावरण इतकं छान आहे की, अभ्यास करताना मन शांत आणि प्रसन्न राहतं. कधी कधी तर लेकचर्स नसले तरी कॉलेजमध्ये जायचो. या वास्तू सोबत, इथल्या लहान सहान प्रत्येक गोष्टी सोबत एक वेगळंच नातं तयार झालंय. जे आम्हाला कायम भावनिकदृष्ट्या एकमेकांशी जोडून ठेवतं.खरं तर या लॉक डाउन मुळे सगळं च ऑनलाईन सुरू आहे. त्यामुळे आता डिग्री कॉलेज सुद्धा ऑनलाईनच. घरी बसून लेकचर्स अटेंड करायला जरासा कंटाळा येतोच, जर आता कॉलेज सुरू असतं तर किती मज्जा आली असती. 
           सकाळी रुपारेल खूप सुंदर आणि मनमोहक दिसतं. लॉक डाउन नसतं तर ते दृश्य रोज पहायला आणि अनुभवायला मिळालं असतं. सकाळसकाळी पारिजातकाचा सुगंध चोहिकडे दरवळतो आणि त्याचा तो सडा इतका आकर्षक आणि सुंदर दिसतो की अक्षरशः डोळे तृप्त होतात. जर एका वास्तूमुळे दिवसाची सुरुवात इतकी सुंदर आणि छान होणार असेल तर ती वास्तू कोणाला नाही आवडणार.. खरंच भाग्यवंत आम्ही रुपारेल चे ! रुपारेल ची खरंच खूप आठवण येतेय..., जावसं वाटतंय त्या वास्तूत, ती नयनरम्य सकाळ, तो मंत्रमुग्ध करणारा परिजातकाचा सुगंध सगळं च पहावंस अन् अनुभवावंस वाटतंय. लॉक डाउन कधी संपतोय आणि आम्ही कधी रुपारेल मध्ये जातोय असं झालंय.. आम्ही नाही आहोत तिकडे तर सगळीकडे खूप शांतता पसरली असावी, कदाचित रुपारेल ला ही ती शांतता असह्य होतं असेल... त्याला ही आमची आठवण येत असावी... येत असेल ना त्याला ही आमची आठवण...?

                                 - आदिती जाधव.

मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१

तुझे माझे असे काही तरी राहुनी जावे...

तू दिसावे मजला अन् उगा भास व्हावे
येता जवळी तू अंग माझे शहारून जावे
त्या चांद राती पार न्हाहूनि जावे
तुझे माझे असे काही तरी राहुनी जावे

तुझ्या डोळ्यांना स्पर्श माझ्या पापण्यांचा व्हावा
चालता चालता उगा तुझा हात माझ्या हातात यावा
माझे स्पंदन क्षणात चं इतके तेज व्हावे 
अन् तुझे माझे असे काही तरी राहुनी जावे

अनेक आठवणींचे किस्से 
मांडता येईना शब्दांत त्यांना इतके भाव 
तुझ्या डोळ्यांनी माझ्या डोळ्यात ते पाहुनि घ्यावे
अन् तुझे माझे असे काही तरी राहुनी जावे

का बरं असे नेहमीचं घडावे 
तू येता समोर मी माझे भान हरपुनी जावे
तुझ्या सोबतीत मी थोडे जगून घेताना
तुझे माझे असे काही तरी राहुनी जावे

असे किती काळ चालावे
'कधी तरी तू आणि मी ''आपण'' व्हावे'
या एका इच्छेने मी तुझ्याकडे पाहावे अन्
 तुझे माझे असे काही तरी राहुनी जावे

                        - ©आदिती जाधव.



गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१

पाटीवरचा खडू।

        आज मोबाईल मध्ये इंस्टा स्क्रोल करता करता अचानक एक किस्सा आठवला. हो ! गावालाच घडलेला.., माझा लहान भाऊ 'स्वरूप' म्हणजे च माझ्या अंकलचा मुलगा. तसा हुशार आहे पण, अभ्यास म्हंटल की, त्याला भूक लागते, झोप येते, कान दुखतो आणि बरंच काही... ओट्यावर रेंगनारा स्वरूप मला गिअरवाली सायकल चालवायला शिकवत होता. बघता बघता मोठा झाला. आमच्या घरी ' बाबू ' या नावाची पिढी जात परंपरा पुढे सरकवत 'स्वरूप' ला सुद्धा 'बाबू' टोपणनाव पडलं. संध्याकाळची वेळ होती, घड्याळाचे काटे पुढे पुढे सरकत होते. मी आणि बारकापोर ( साक्षी ) ओट्यावरच बसलो होतो. तेवढ्यात बाबू ची एन्ट्री झाली. अभ्यासाचं दप्तर घेऊन त्यातली पाटी आणि खडू काढून आमच्या समोरच अभ्यासाला बसला. अंक लिहायचे ठरलं. पाटीवर रेषा मारायला पट्टी सापडत नव्हती, शेवटी काय तर पुस्तकाच्या आधारानेच रेषा मारल्या. मी सहजच त्याच्या दप्तरात हात घातला आणि मला माझ्या लहानपणीचा सगळ्यात आवडता खाऊ सापडला, 'पाटीवरचा खडू'.
        पाटीवरचा खडू ..., जवळजवळ सहा - सात वर्षांनंतर, त्याला बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं. मोह आवरेनासा झाला मग काय टाकला मी तोंडात. इतक्या वर्षांनंतर आजही त्याची चव काही बदलली नव्हती अगदी मातीसारखी चविष्ट. मी कधी मातीची चव घेतली नाही पण; मानवी देह..., वासावरून चवीचा अंदाज घेता येतो की. त्या क्षणाला  मी स्वर्गसुख अनुभवल्यासारखं वाटलं. दुर्दैवाने हे बाबू ने बघितलं, ' ए तू काय खाल्लसं..? खरं खरं सांग खडू खाल्लास ना..? नको खाऊस, टाकून दे आधी, तो चांगला नसतो" असं मला म्हणाला. मी त्याच्याकडे पाहत च बसली त्याच बोलून होण्याआधी मी खडू खाऊन जवळपास संपवला होता. तेवढयात काकी आल्या आणि बाबू ने, काकी ला, मी खडू खाल्ल्याचं सांगितलं. मग काय, काकी ही बोलल्या मला " खरोखर खाल्लास तू..?, खडू काय चांगला असतो..? असं कायपण खात नको जाऊस." मी फक्त मान डोलावली. क्षणभरासाठी मला कळलंच नाही की, 'मी अजून ही लहान आहे की, बाबू मोठा झालाय..?'
         खडू खाणं चांगलं नसतं माहिती आहे मला पण, त्या खडू शी अनेक आठवणी जोडल्या आहेत शिवाय, त्याची चव मला इतकी आवडते की त्यापुढे कसलाच विचार करावासा वाटत नाही. मी हट्टी आहे, थोडीशी रागीट आणि बालिशपणा माझ्या अंगात ठोसून भरलाय त्यामुळे, अंगणवाडी ते इयत्ता चौथी या वर्गांत असताना अनेकदा मित्र - मैत्रिणींशी वाद - विवाद झालेत. गट्टी करायला तर हवी मग ती कशी..? त्यावर छान तोडगा काढला होता आम्ही, 'ज्याला गट्टी करायची असेल, तो एक अख्खा खडू देईल'. आमच्यातले वाद नेहमी या पाटीवरच्या खडू ने च मिटवलेत. मग घरी आल्यावर अभ्यासाला बसताना मम्मी विचारायची, " रोज दोन खडू घेऊन जातेस, करतेस काय इतकं त्याचं..?" आता तिला कसं सांगणार, एक खडू तर गट्टी जमवण्यात हातातून जायचा आणि दुसरा अर्धा पोटात; अर्धा पाटीवर लिहिता लिहिता हरवुन यायचा. मग मी तिला काही ठराविक पण; अगदी खरी खुरी कारणं द्यायची, ती म्हणजे... "आज खूप अभ्यास होता, शुद्धलेखन लिहिलं, गणितं सोडवली, आणि किती चित्र काढली मग खडू संपला, मधल्या सुट्टीत खडू कुठे हरवला काही माहीत च नाही, मी शोधलं पूर्ण वर्गात पण नाही मिळाला,माझ्या मैत्रिणीने आणला नव्हता खडू मग तिला दिला, ती मानसी माहितीये ना तिचा खडू हरवला, मग माझ्याकडच्या खडू मी तिला दिला." माझी ही अशी कारणं ऐकून ती सुद्धा मला तितक्याच जोमाने पुन्हा पश्न विचारायची, मग मी निरुत्तर होऊन शेवटी माघार घ्यायची.
          हा खडू किती तरी वेळा निमित्त ठरलाय, शाळेचे दिवस पुन्हा पुन्हा अनुभवण्याचं. अशी खूप लहान मुलं असतील ज्यांनी कधी खडू खायचा विचार ही केला नसेल; त्या उलट आम्ही खडू हातात आला की, तो थोडासा तरी तोंडात टाकल्याशिवाय करमत नाही. काळ्या रंगाची पाटी, चविष्ट खडू, नवीन पुस्तकांचा वास, वहीच्या उजव्या बाजूच पान ह्या सगळ्या गोष्टी तेव्हापासून प्रिय होत्या त्या अगदी आतापर्यंत. कमाल वाटायची ह्या सगळ्या गोष्टींची ! असं कोणी नसावं बहुतेक.., ज्यांना ह्या गोष्टीं जवळच्या आणि आवडीच्या नाहीत. खरं तर ह्या सगळ्यांमुळे शाळेतले दिवस इतके सुंदर आणि आठवणीत राहण्यासारखे गेले. ज्या दिवसापासून शाळेत जायला लागली, त्या दिवसापासून ह्या सगळ्या गोष्टींशी पक्की मैत्री झाली. अजून ही ती मैत्री तितकीच पक्की आहे इतकी की, कधी ही न तुटणारी..!
          - ©आदिती जाधव.




#मराठी #मराठीलेख #पाटीवरचा_खडू #शाळेचे_दिवस #आठवणी  

Featured Post

पत्रास कारण की...

प्रिय तू ,    आज खरंतर इतक्या वर्षात पहिल्यांदा तुला पत्र वगैरे लिहितेय, थोडं दिल खुलास होऊन सांगतेय. तुझी तक्रार असावी माझ्याकडून की, मी का...